May 25, 2012

विवाहितेची आत्महत्या


काल एक बातमी कानावर आली ...
विवाहितेने आत्महत्या केली... !
मनात विचारचक्र सुरु झाले
का ? कसे ? असे का केले.

तर्क वितर्कांचे ... थैमान सुरु झाले

नवर्याचा जाच असावा,
सासर्याचा त्रास असावा.
सासू खूप बोलत असेल,
नणंद मनात सलत असेल.

जगण्याला कंटाळली ...
कि आणखी कुणाला भाळली असेल
कोणी तरी नडले असेल
म्हणून अघटीत घडले असेल.

जगणं सध्या महाग आहे,
महागाईन घेरलं असेल.
डोक्यावर मोठा डोंगर असेल,
म्हणून सावकारीन मारलं असेल.

दुनियेलाही तो भीत नसावा,
नवरा दारू पीत असावा.
हे हि दु:ख दाटलं असेल
म्हणून 'औषध' घेतलं असेल. 

शेवटी काय ... !
जगणं तिला झेपलं नसेल
काळीज तिचं इतकं छोटं
कि दु:ख त्यात लपलं नसेल.

तर्क वितर्क हजार झाले ..
मनालाही पटून गेले.
यात तिचं चुकल काय ?
कित्तेक जीव असेल गेले.

सगळीकडचा आक्रोश
तिची कहाणी सांगत होता
माझ्या मनातला हरेक तर्क
मनात पुन्हा रांगत होता.

तेवड्यात एक टाहो आला
भुकेल्या पोटाचा .....,
दुधाच्या ओठाचा ....!

आता सगळे तर्क मातीत गेले
रांगते विचार जागीच मेले,
ती विवाहिता,
विवाहीताच राहिली असेल...
तिला शेवटपर्यंत
आईपण कळलं नसेल ! 

- रमेश ठोंबरे    

May 18, 2012

~ गांधी नंतर ~



या देशाने काय पाळले गांधी नंतर  ?
फोटोला बस हार माळले गांधी नंतर.
 
विटंबनाही रोज चालते इकडे-तिकडे  
पुतळे कसले, तत्व जाळले गांधी नंतर

देश बदलला, देशाचा गणवेश बदलला
खादीलाही नित्य टाळले गांधी नंतर

शस्त्राहुनही खणखर असते निधडी छाती
हिंसेपुढती रक्त गाळले गांधी नंतर
गांधी 'हत्या' 'वध' ठरवण्या आमच्यासाठी ?  
इतिहासाचे पान चाळले गांधी नंतर
देश आमचा गांधीवादी सांगत सुटलो, 
नथुरामाला किती भाळले गांधी नंतर ?

नको 'रमेशा' निराश होऊ कातरवेळी
'राजघाट'ने नेत्र ढाळले गांधी नंतर.

- रमेश ठोंबरे
(महात्म्याच्या कविता)