Dec 22, 2013

समजत नाही



कोण कुणाला जाळत आहे समजत नाही
कोण कुणावर भाळत आहे समजत नाही

सांगत होता सात जन्म मी तुझाच आहे 
आज असा का टाळत आहे समजत नाही 

रगडत आहे वाळू मोठ्या विश्वासाने, 
तेल खरे का, गाळत आहे समजत नाही 

माणुसकी जर मला भेटते गल्लो गल्ली 
दिवस कुणाचा पाळत आहे समजत नाही 

प्रेमाचा जर स्पर्श नकोसा तिला वाटतो, 
मोगरयास का माळत आहे समजत नाही 

गांधीवादी चालत गेले त्या रस्त्यावर 
रक्त कुणाचे वाळत आहे समजत नाही 

- रमेश ठोंबरे 

Dec 19, 2013

माझी बायको जेंव्हा ड्रायव्हिंगच्या मूड मध्ये येते



माझी बायको जेंव्हा ड्रायव्हिंगच्या मूड मध्ये येते
तेंव्हा ती माझ्यासह माझ्या गाडीवर सूड घेते. 
मग स्टेअरिंग, ब्रेक, क्लच, यक्सलेटर … 
सगळे सगळे मला केविलवाणे दिसू लागतात …
गीअरची ती जेंव्हा मुरगाळते मान,
तेंव्हा मीच मानेला झटका देवून घेतो.
इकडे तिकडे पाहत … थोडा मोकळा होवून घेतो.

आता गाडी असते तिच्या नवर्याची म्हणजे तिचीच,
आणि रस्ता तिच्या बापाचा … म्हणजे तो हि तिचाच.
मी मात्र नाविलाजास्तावा शेजारचं शिट अडवून बसलेला असतो.
सुटकेसाठी एक एक सेकंदाची उलटी गिनती करत असतो.

कधी डावीकडं कधी उजवीकडं …
स्टेअरिंग डोकं गरगरन्या इतपत फिरत असतं.
तरीही चाक बिचारं … गप गुमान रस्ताने चालत असतं.
मागे ब्रेक, करकच्ल्याचे … कोणी आडवं झाल्याचे …
कोणीतरी उद्धार केल्याचे…. आवाज येत असतात.
साइड मिररमध्ये मला असे बरेचे चेहरे दिसतात.

तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि
उत्साह मला दिसत असतो…
मी मात्र जीव मुठीत घेवून उसनं हसू हसत असतो.

एका चौकात हि कहर करते ….
सिग्नल लागलेला असताना … यक्सलेटर देते.
गाडी दोन हात पुढे …
मग न सापडणारा
अन मधेच पडणारा रिव्हर्स ….
मागच्या गाडीचा जीवाच्याआकांताने
हॉर्न चा थयथयाट …
मग यक्सलेटरचा पाय ब्रेकवर ….

तेवढ्यात …. शिटी फुंकत … मामा समोर ….
पुन्हा सिग्नल लालचा हिरवा ….
पुन्हा ब्रेकवरचा पाय यक्सलेटरवर ….
मामा तसाच शिटीसह मागे … हतबल … हताश !

पुन्हा … गीअर, यक्सलेटरवर बलात्कार ….
गाडीचे ऐकवणार नाहीत इतके चित्कार … !
मी मात्र थंड आणि षंड !
गाडीवर होणार अन्याय उघड्या डोळ्याने पाहत असतो.
"नाही नाही काहीच नाही …. साधा विनयभंग सुद्धा नाही !"
अशीच कबुली देत असतो !

एवढं सगळं झाल्यावर … वनपीस गाडी …
सोसायटीच्या आवारात …!
नेहमीचा 'पार्किंगचा' स्पार्क अनुभवण्यासाठी
जमलेल्या आवारा टोळक्याच्या ताब्यात !

''मागे घ्या, वाहिनी पुढे …
राईट … राईट … राईट ….
राईट … म्हणजे 'बरोबर' नाही हो 'राईट' घ्या
उजवीकडे घ्या हो …
आता लेफ़्ट … मागे मागे मागे या या या …
या मागे मागे … हं लागली !"

नंतर कोणी तरी हळूच 'थोडी भिंतीला लागल्याची' सांगतो.

मी पाहणार इतक्यात …
"बडे बडे शहरो में … … "
च्या आवेगात हि मागं ओढते …!
नकळत माझी अक्कल आणि इज्जत सुद्धा काढते.
मी बिचारा, बापडा मनात येईल तसा …
'तिच्या' मनात येईल तसा तिच्या मागून चालत जातो …
आणि एकदाचा आजच्यापुरता हिच्या ड्रायव्हिंगचा अंत होतो !"

- रमेश ठोंबरे 

Nov 6, 2013

अभिव्यक्ती


एक कवी,
त्याच्याच ए. सी. केबिन मध्ये बसून 
लिहितो त्याच्या गावाच्या 'दुष्काळाची एक कविता'
इतकी खोल, इतकी विदारक कि,
वाचताना वाचकाच्या मनात शिरते आर पार … 
आणि पिळवटून टाकते त्याचं काळीज. 
त्याला आठवतो त्याने मागे सोडलेला त्याचा गाव. 

तो उभा राहतो …. 
कवितेतील त्या नायकाच्या जागी … 
आणि आठवू पाहतो त्याचा भूतकाळ …
त्याला दिसू लागते चुलीसमोर फुकणी फुकत 
बसलेली त्याची माय…
तिच्या डोईवर नावापुरताच उरलेला 
जीर्ण साडीचा फाटका पदर …
सभोवताली काळवंडलेल्या घराच्या भिंती… 
घामानं मळकटलेली बापाची 
कधी काळी पांढरी असलेली टोपी. 

टोपीवरून आठवतो … त्याला त्याचा बाप … 
दिवस उगवायच्या आत, 
खायला एक तोंड कमी म्हणून फोडलेल्या बैलजोडीतील 
एक बैलासह निघायचा शेतावर. 
दुसऱ्या बैलाच्या जागी स्वतःलाच जुंपायचा …
अन कधी त्याच्या मायलाबी. 
तेंव्हा मायला म्हणायचा, 

"औंदा पिक चांगलं आलं की 
माह्या सोन्याला जोडी बी आणील आन तुला नवी साडी बी"
मायला धीर यायचा, अन 
माय बैलाच्या बरोबरीन ओत्त ओढायची !
आणखी पुढ वाचल्यावर त्याला आठवतो … 
याही वर्षी कोरडाच गेलेला पावसाळा,
दावण रिकामी करून डोक्याला हात लावून बसलेला बाप.
पुन्हा आठवायची फुकणी फुकणारी माय,
आणि किती तरी वेळ नुस्तच उकळणार चुलीवरच पाणी. 

आता तो कविता वाचतच नाही …
कारण त्याच्या डोळ्यासमोर येत परसातलं भलं थोरलं झाड … 
जिथं बापानं माहेरपणाला आलेल्या लेकीच्या पहिल्या पंचमीला 
बांधला होता हौसेन तिच्यासाठी झोका …. 
आज आठवतोय त्याला, त्याच झाडावर …. 
कदाचित त्याचं फांदीला
आणि कदाचित त्याचं दोरीवर 
लटकणारा बाप !

कविता पुढं न वाचताच तो पुस्तक खाली ठेवतो 
आणि सलाम करतो, त्या कवीला आणि 
कवीच्या त्या अभिव्यक्तीला !
आणि लिहितो एक अभिप्राय, 
कविता काळजापर्यंत पोचल्याचा !

तेंव्हा खुश होतो कवी …
स्वतःच्या कलाकृतीवर, 
आणि वाचकाच्या अभिव्यक्तीवर !

रमेश ठोंबरे
............................................................................................................................................................
मराठी कविता समूहाच्या 'कविता विश्व' दिवाळी अंकातील माझी कविता …. 
'मराठी कविता समूहा'च्या दिवाळी अंकाचे चे ३ रे वर्ष …. आजही आठवतंय …. दोन वर्षांपूर्वी, पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे (जानेवारीत सासवड येथे होणाऱ्या) नियोजित अध्यक्ष कविवर्य फ़. मुं. शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादेत करण्यात आले होते. 

Oct 27, 2013

तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये …


तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये … 
आभाळ जिथ धरतीला टेकलंय ते आभाळ पाहून ये. 
घाई करू नकोस, 
कुठल्याही निष्कर्षाला पोहचण्याची …
जगण्याचा वेग थोडा मंद कर … 
धावू नकोस नुसताच … 
जगून घे !

कुठल्याच गोष्टी नसतात अंतिम सत्य …
त्यांनी लिहून ठेवलंय म्हणून स्वीकारायचं, 
अन मला पटत नाही म्हणून नाकारायचं. 
याला काय म्हणायचं ? 

घाई करू नकोस, 
अनुभवाच्या कसोटीवर घासून घे 
तुझ्या सद्सद विवेक बुद्धीने तपासून घे !

मन सुद्धा बोलतं कधी कधी सत्य,
त्यात हि मानत जा तथ्य !
मात्र त्याच्यावर हवा थोडा लगाम …
कारण थोडी मोकळीक दिलीस तर धावेल बेफाम !
मन कधी आपलं तर … कधी परकं,
कधी देतं साथ तर कधी लाथ हि !

म्हणून थोडा वेळ जावू दे … 
घाई करून नकोस … सबुरीने घे !
कारण कधी कधी आपण ज्याला अंतिम सत्य मानतो …
त्यात होत असतात बदल,
नवी दिशा मिळाली कि, 
बदलतात व्याख्या 
बदलतात संदर्भ 
बदलतात विचार ! 
म्हणून थोडा वेळ दे …
तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये … 
आभाळ जिथ धरतीला टेकलंय ते आभाळ पाहून ये. 

- रमेश ठोंबरे 
www.rameshthombre.com

Oct 26, 2013

किती जाळला



किती जाळला जीव तुझ्यावर ? 
आठवतो मी तू गेल्यावर 

तीट लाव तू नजरेसाठी 
नको भरोसा या डोळ्यावर

सुखात ती तर, सुखी असू दे
पाठीवरती घाव दिल्यावर

जगणे माझे तरून जाईल
आठवणींच्या हिंदोळ्यावर

असे कसे रे प्रेम रमेशा ?
संपून गेले उलगडल्यावर

- रमेश ठोंबरे
.....................................

बोलू नकोस आता काही
ओठावरती ओठ दिल्यावर !
................................... 

Oct 17, 2013

दुष्काळ


दुष्काळ दाटलेला
डोळ्यात साठलेला
आधीच बाप माझा
काळीज फाटलेला.

मातीत राबताना
घमास सांडताना
व्याकूळ रोज होतो
देवास भांडताना

स्वप्नात रोज त्याच्या
येतात टोळ धाडी
पाण्याविनाच डुबते
आकंठ रोज होडी

पाऊस आज यावा
करतोय रोज धावा
वर्षे अनेक सरली
कोणास दोष द्यावा

आभाळ रंग दावी
अध्यात्म आस लावी
अभंग भंगलेला
अन कोरडीच ओवी

मातीत राबताना
डोळ्यास भावलेला,  
दिसतोय बाप माझा
गळफास लावलेला !

- रमेश ठोंबरे



Oct 14, 2013

"मनाच्या काठावरून"... मन-गाभाऱ्यात ...


'मन' या विषयावर कितीतरी साहित्य आजपर्यंत अनेक भाषांमध्ये आले आहे आणि येतच आहे. "मन म्हणजे न सुटणारा गुंता तर कधी उलगडता उलगडता कोड्यात टाकणारे कोडे, ज्याचा थांग विज्ञानालाहि लागला नाही ! मन म्हणजे कोणासाठी कुतूहलाचा, तर कोणासाठी संशोधनाचा विषय. जिथ कित्येक पुस्तकांचा वाचून चोथा करणाऱ्या शिक्षिताला मनाच्या आसपास हि भटकता येत नाही तिथ बहिणाईसारख्या जिवनाच तत्वज्ञान जगण्याच्या शाळेत शिकणाऱ्या, तुमच्या आमच्या दृष्टीने अशिक्षित असणार्या कवियत्रीला मनाचा थांग लागतो !

परवाच्या डोंबिवली मेळाव्यात Manisha Silam 'मनीषा सिलम' यांचा 'मनाच्या काठावरून' या कविता संग्रह हातात पडला. मुखपृष्टाच देखणेपण आधीचा मनात भरलं होतं आणि आत्ता संग्रह वाचण्याची उत्सुकता होती…!

'काठावरून डोहात उतरताना ….' असे शीर्षक असलेली 'अशोक बागवे' यांची अतिशय बोलकी प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे, प्रस्तावना वाचतानाच आपल्या हातात कवियत्रीने कुठल्या आशय आणि विषयाच्या कविता ठेवल्या आहेत आणि त्याचा दर्जा काय असणार आहे याची काल्पना येते. 

एकूण ४९ रचनांमधून मनीषा सिलम यांनी मनाचे पदर उलगडण्याचा प्रयत्न या कवितासंग्रहात केला आहे. 'अपूर्णता' या रचनेत त्या सुरवातीलाच म्हणतात …. 
'प्रत्येक अपूर्णतेला पूर्णत्वाची आस आहे 
खर तर पूर्णत्व हाही एक भासच आहे !' … किती बोलक्या ओळी आहेत या 
कवियत्री पुढे सांगते कि, सगळ्याच गोष्टी पूर्ण करायच्या नसतात… कारण अपुर्नतेलाहि एक वेगळ मोल असत.

'कैफ' नावाच्या कवितेत कैफ फक्त सुखाचाच नसतो तर दु:खाचाहि एक कैफ असतो , म्हणूनच आपण बर्याचदा आपलं दु:खच गोंजारत बसतो. कारण ते सेफ आणि चिरंतर आहे !

'मनातलं मुल' हि कविता अतिशय सुंदर आहे, मला आवडली ! 
कारण ती वाचताना मला माझ्याच एका कवितेतील ओळी नकळत आठवल्या 
" तुमच्या आमच्या मनात 
एक तान्ह मुल रांगत असतं, 
मी अजून लहान आहे … 
हेच नव्याने सांगत असतं" 
आणि या सोबतच आठवली पाडगावकरांची जिप्सी हि रचना !
आपल्या मनात लपलेल लहान मुलाच निष्पाप मन याच वर्णन करून 'ज्यांन त्यानं जपावं आपल्यातलं लहान मुल' असा अतिशय मोलाचा सल्ला हि कविता देते.

'नरक' या कवितेत संवेदनशील मनाची घुसमट मांडली आहे, समाजसेवेच्या नावाखाली, हार तुरे मिरवणारे नेते असोत कि सामाजिक कार्यकर्ते किंवा सिग्नल वर एखादा आशाळभूत चेहरा पाहून त्याच्या हातावर दोन रुपयाचे नाणे ठेवणारा सामान्य मानूस …आपल्या सगळ्याची समाजसेवा हि याचा मार्गाने जाते आणि इथेच संपते. आपल्याच सारखे काही विचारवंत यावर पानभर लेख लिहितात किंवा प्रसवतात एखादी वांझोटी कविता, जी कधीच यांच्यापर्यंत पोचत नाही, खावू च्या खालचा कागद होवून ! त्यामुळे कवियत्री इथे एक व्यथा मांडते कृतीशिवाय होत असलेल्या प्रयत्नाची, हि कविता आहे त्या भुकेल्या जीवनासाठी, ज्यांच्यासाठी मुलभूत गरजा भागवणे हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. इथे कवियत्री नकळत जेंव्हा दोन सामाजिक स्तरावर जावून तुलनात्मक विचार करू लागते तेंव्हा, तिला एकीकडे दिसतात भुकेसाठी वणवण करणारी कोवळ्या वयात कामाला लागलेली हात, तर दुरीकडे दुधातुपात न्हाणारी उच्चभूंची लेकरं ! आणि हे सगळ कवियत्री अतिशय कमी शब्दात आणि समर्पक रित्या मांडते हेच या रचनेच वैशिष्ट्य आहे. 

पुन्हा एकदा पाडगावकर माझ्या मनात डोकावतात (कवियत्रीच्या मनात डोकावले असतील का ?) जेंव्हा मी …. 
"आयुष्य कस ? 
ज्याला जसं 
उमगलं तसं … " या ओळी वाचतो 
वेगळ्या फोर्म मधली कविता आहे, आयुष्याविषयीचे तत्वज्ञान अगदी सोप्या आणि मोजक्या शब्दात मांडते हि कविता. 

'शाप' 
हि इन-मीन दहा ओळींची कविता … पुन्हा एकदा आयुष्या विषयी बोलते , शाप कुठला असू शकतो … जमिनीवर घट्ट पाय रोवण्याचा कि आकाशात भरार्या न घेण्याचा ? कि वर्तमानात जगण्याचा !

'जग हे संधीसाधूंचे' या कवितेतून एक धाडसी विधान कवियत्रीने केले आहे, आजची परिस्थिती पाहता याचा प्रतेय हि पावलो पावली येतो. प्रत्येकजन मुळात संत असतो पण त्याच्या मनात एक रावणही निद्रिस्त अवस्थेत असतोच असतो …. आणि त्याला संधी मिळायलाच अवकाश तो जागृत होतो … आता काही लोक अश्या कितीतरी संधी सोडतात हि …. म्हणूनच कवियत्री पुढे म्हणते कि, 
" संधी मिळायलाच अवकाश कि,
गरीब वाटणारा माणूसहि 
बनतो हुकुमशहा !"

पुढील एक रचनेत दु:ख आणि पावूस यांची साथ कशी असते हे रेखाटले आहे, 

"ज्याची तिची राधा अन 
जिचा तिचा कृष्ण" 

"नाती तुटताना आवाज होत नाही"

"कुठल्या हि गोष्टीचा प्रवास सुंदरच असतो… 
पण हे आपल्याला प्रवास संपल्यावरच उमगतं …"

अश्या किती तरी सुंदर ओळी पुढील कवितांमधून वाचनात येतात आणि … 
मनाच्या काठावरून फेरफटका मारताना आपण … "मन गाभार्यात प्रवेश करतो …." आणि कविता संग्रह संपतो… !

एक विलक्षण उत्सुकता बाकी राहते… मन गाभार्यातल्या काळोखातील मनाचे पदर आणखी उलगडले जायला हवे होते असते वाटते … पण कदाचित वाचकाची हि उत्सुकता …. कवियत्रीने जाणूनच वाढवली आहे, त्यामुळे 'मनीषा सिलम' यांच्या पुढील लेखनात आपल्याला मनाचे आणखी काही पदर उलगडताना दिसतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही 

कविता संग्रह वाचून संपवला आणि 
पुन्हा एकदा 
कधी "मन वढाय वढाय" 

तर कधी 
"मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल" 

या प्रसिद्ध गीतांच्या ओळी मनात फेर धरत गेल्या 

हा छोटेखानी कवितासंग्रह अतिशय सुंदर झाला आहे … मात्र आणखी काही कविता यात हव्या होत्या असे वाटते, मुखपृष्ठ चांगले आहे. 
पुढील संग्रहासाठी काढताना या कवितांसाठी वापरलेला टाईप (फोन्ट) टाळून … साधा फोन्ट घ्यावा जो (संपूर्ण प्रस्तावनेसाठी वापरला आहे) आणि पुस्तकाचा कागद न्याचरल शेड चा असल्यास कवितासंग्रह आणखी देखणा होईल. 

कविता संग्रह : मनाच्या काठावरून 
कवियत्री : मनीषा सिलम 
प्रकाशक : उद्वेली बुक्स, ठाणे 
मुल्य : ८० रु. 

- रमेश ठोंबरे

Oct 6, 2013

..जीव हारून निजला ... |

..............जीव हारून निजला ... |
असा दमला भागला
...............जीव हारून निजला ... ||

डोळा सले भूतकाळ ...
आत वेदना ती खोल.
मानव्याचा जनम र
आज असा वाया गेला ...... १
...............जीव हारून निजला

झोप लागणार कशी ?
उगा बदलतो कुशी.
चिता मिटवील चिंता
असा इचार र झाला ....२
...............जीव हारून निजला

त्याची गाय तूटलेली ...
याची माय विटलेली.
तिळ तिळ तुटे जीव
घर घर काळजाला .... ३
...............जीव हारून निजला

डोंगरात मरीआई ...,
कधी दिसलीच नाई
शेरडाच्या जीवा वरी
इथ लांडगा मातला ....४
...............जीव हारून निजला

फाटलेल्या आसऱ्याला
तुटलेल्या वासराला
घेर कुशीमंदी देवा ...
लई येळ आता झाला ... ५
...............जीव हारून निजला
असा दमला भागला
...............जीव हारून निजला ... ||


- रमेश ठोंबरे

Sep 24, 2013

मनमौजी



आकाशाची छत्री करतो, गातो गाणी 
रस्त्याने तो चालत असतो उडवत पाणी 
कुठे जायचे, काय खायचे, नसते चिंता
डोक्यामध्ये नसते काही, नसतो गुंता !

पाठीवरती घेतो काही, भटकत फिरतो
त्यात कधी तो झाडांसाठी पाणी भरतो
पाहाल तर सोडून दावी ते नेटाने
आणले म्हणतो पक्षांसाठी चारच दाने !

वाट चालते त्याच्यासंगे मार्गक्रमाया
अन वाऱ्याशी सख्य जमवले, दिशा ठरवण्या
थकल्यावरती तरु पाहुनी अडवा होतो
डोक्याखाली दगड घेवूनी झोपी जातो !

घड्याळ म्हणजे, त्याला काही माहित नसते
त्याच्या लेखी जे सगळे ते 'त्याचे' असते.
तुला पाहिजे ? घेवून जा तू तुझेच आहे
मला पाहिजे त्याची चिंता 'त्याला' आहे !

अंतरात माझ्या लपून बसला आहे कुणी
त्याची न माझी ओळख बहुदा आहे जुनी
नाव पुसता हसतो नुसता एकांडा फौजी
मी हसतो, मनात म्हणतो, "आहे मनमौजी !"

- रमेश ठोंबरे 

Sep 18, 2013

भेगाळली जमीन

भेगाळली जमीन 

भेगाळली जमीन 
तिला पावसाची आस 
त्याचं नशीब फाटक 
त्याचं आभाळ भकास. 

तिचं तापलेल अंग
तिला सोसवेना दाह
त्याचा वळीव कोरडा
मन आटलेला डोह

तिची नवथर काया
जसा शेलाटीचा ढंग
इथं पेटता पेटना
त्याचं रापलेलं अंग

उर आगीत पेटता
नको चंदनाची चोळी
बाग बहरून आली
शेत विसरला माळी

आला सोसाट्याचा वारा
बारा शिव ओलांडून
गेला अधाशी मनानं
उभ्या पिकाला सांडून

- रमेश ठोंबरे 

Sep 4, 2013

कवी सर्वश्रेष्ट


सरी उम्र था मै अकेला चला
जनाजेमे मगर कारवा चला !

- कवी सर्वश्रेष्ट
…………………………………………………………


सांस लेता हू तो जिंदा होने का पता चलता है
दर्द होता है तो तेरे आने का पता चलता है

- कवी सर्वश्रेष्ठ
…………………………………………………………

Aug 19, 2013

|| आज राखीचा ग सन ||



आज राखीचा ग सन,
धाव घेई माझ मन ||
माझ्या ताईच्या मायेच,
सर्वात मोठं धनं ||१|| 

नको आडवू मज,
सखे आजच्या दिवशी || 
बंधूप्रेमावीन ताई,
राहे सालभर उपाशी ||२||

तिला भेटायला आज, 
झाला जीव हा व्याकूळ | 
राखीच्या निमित्तान 
आज काढलाय वेळ ||३||

हट्ट सोड तू ग प्रिये 
या आजच्या रातीचा ||
नाही राखीहून मोठा,
हा विरह प्रीतीचा ||४||

उगा नको रुसू,
आज आनंदाच्या क्षणी ||
भाऊ तुलाही आहे,
ठेव त्याला हि ध्यानी ||५||

परी प्रियेचा तो हट्ट,
नाही नाही कमी झाला |
अशा पेचामध्ये बंधू,
पार वैतागून गेला ||६||

काय कराव म्हणे, 
आसल्या या क्षणी ||
एकीचा मी आहे भाऊ,
आहे एकीचा मी धनी ||७|| 

पण नाही नाही आता,
आता थांबणार नाही ||
एक बहीणच आहे,
तिला टाकणार नाही ||८||

भाऊ निघाला हो आता,
सारे बंधन तोडून ||
एक दिवसासाठी,
सुखी संसार मोडून ||९||
...
आला धावत पळत,
घोट आसवांचा गिळत ||
बहिणही होती तशी,
भावालाच न्ह्याळत ||१०||

उभी दारात बहिण,
हाती रेशमाची राखी ||
ऐकता भावाची कहाणी,
झाली मनोमनी दु:खी ||११||

ओलावल्या नयनांनी,
तिनं बांधियली राखी || 
पाठीराखा भाऊ माझा, 
मी ही तुझी पाठीराखी ||१२||
...
आता बहिण निघाली,
बंधू भावाच्या दारी ||
विनवण्या वाहिनीला 
मोडलेल्या संसारी ||१३|| 

घरी भावाच्या जाता, 
बहिणीस वहिनी दिसली ||
म्हणे वहिनी तू का ग,
माझ्या दादावरी रुसली ||१४||

भाऊ माझा ग प्रेमळ,
कसा विसरेल तुला ||
एक बायको आहे,
एक बहिण ग त्याला ||१५||

एक पाठशी आलेली,
एक पाठशी जाणार ||
दोघी त्याच्या पाठराख्या 
कसा कुणाला सोडणार ? ||१६|| 

आज राखीचा ग सन 
धाव घेई त्याच मन ||
उद्या तुझच होयील,
पती नावच हे धनं ||१७|| 

- रमेश ठोंबरे
www.rameshthombre.com