Showing posts with label महात्म्याच्या कविता. Show all posts
Showing posts with label महात्म्याच्या कविता. Show all posts

Dec 2, 2018

आरक्षण हवंय !


काही काळासाठी दिलेलं आरक्षण
या देश्याच्या भाळावरची अमीट खूण होऊन बसलंय

बाबासाहेब,
या देशात लोकशाही असली तरी
हा देश राजकारण्यांच्याच तालावर नाचणार
हे माहीत नव्हतं का तुम्हाला ?

बाबासाहेब,
आज सगळे प्रश्न मागं पडलेत
अन मागासलेपण दाखवण्याची शर्यत सुरू झालीय.

निवडणूका जवळ आल्या की
जात धर्माच्या अस्मिता टोकदार होतात ...
मंदिर मस्जिदी आठवतात ...
अश्याच कुठल्यातरी गोंधळात
शिक्षणाचं बाजारीकरण करणार विधेयक
एकमतानं पास होत,
आणि साक्षर म्हणवणारा देश
दिवसेंदिवस निरक्षर होत जातो ...

बाबासाहेब,
देशाला अनुदान हवंय
बाबासाहेब,
काहीही न करता झालेल्या नुकसानीची
नुकसान भरपाई हवीय
बाबासाहेब,
देश निरक्षर झालाय
देश दरिद्री झालाय
देश मागास आलाय !

बाबासाहेब,
आता देशाला संविधान नकोय
आरक्षण हवंय !

- रमेश ठोंबरे

Aug 12, 2017

माझा गांधीवाद



खुद्द गांधींनाही पेलवला नसता
इतका प्रखर करुन ठेवलाय आज आम्ही गांधीवाद

म्हणूनच ...
आमच्या रोजच्या व्यवहारातून तो कधीच झालाय बाद !

गांधींपेक्षाही कट्टर गांधीवादी ...
म्हणवून घेण्यात आम्हाला आमचं कौतुक वाटतं
अन् गांधीवादाचं हे कर्मट रुप पाहून
महात्म्याचंही काळीज फाटतं.

खरंच इतका कठोर आहे गांधीवाद की
गांधीवाद्यांनाच त्याची भिती वाटावी,
भल्याभल्यांना अपयश यावं अन्
अहिंसेनं अशक्याची पायरी गाठावी ?

मान्य आहे मला ‘माझा गांधीवाद’
जो इतरांपेक्षा वेगळा असेल,
पण माझ्या गांधीवादाचा
एक तरी अंश मला माझ्या आचरणात दिसेल !

- रमेश ठोंबरे
दि. २ ऑक्टोबर २०१२

Feb 21, 2015

बापू, तुम्ही आमचे आभार मानायला हवेत


बापू
तुमचा जन्मदिन आम्ही मर्यादित ठेवला
सरकारी कार्यालयापुरता  ….
अन सामाजिक भान म्हणून ….
'राष्ट्रपित्याला विनम्र अभिवादन !'
म्हणत वर्तमान पत्रातील एका कोपऱ्यापुरता.

आम्ही तो रुजू दिला नाही जनमानसात.
कारण …
मग त्याचा झाला असता उत्सव.
… तुमच्या प्रतिमेला हार घालून ….
निघाल्या असत्या चौका-चौकातून मिरवणुका.
'ड्राय डे' दिवशीही झींगली असती तरुणाई.

डीजे वर वाजणाऱ्या 'चिकण्या चमेलीवर'
तर्राट झुंडीन धरला असता ताल .
अन मुजोर वादळात उडाला असता कुणाशीचा झगा
तुमच्याच मिरवणुकीत तुमच्या समोर !

बापू
आमचे आभार माना
खंत करू नकात,
'सरकारी भिंतींशिवाय, कोणीही तुमच्या पाठीशी नसल्याची'
हरिजन, गिरीजन, बहुजनाच्या देवासारखे
कोण्या एकट्याचे नाही आहात तुम्ही !
 
आम्ही, तुम्हाला म्हणतो,  
बापू, राष्ट्रपिता अन महात्माही,
पण देवत्व कधीच बहाल केलं नाही तुम्हाला
कारण तुम्हाला देव्हाऱ्यात बसवलं असतं तर
मग आशाचं मावल्या असत्या
पुन्हा 'गांधी' जन्माला घालण्याच्या !

बापू
तुम्ही आमच्यासाठी सामान्य
म्हणूनच आम्ही दाखवू शकतो तुमचे दोष,
काढू शकतो तुमच्या शिकवणीतील उणीवा
कट्ट्यावर बसून देवू शकतो शिव्या
अन अहिंसा शिकवणाऱ्या कृश देहावर …
झाडू शकतो गोळ्याही बिनधास्त  !
. .
. .
. .
. .
. .
आम्ही होवू दिले नाहीत जयंतीचे उत्सव …
आम्ही बहाल केलं नाही तुम्हाला देवत्व,
आम्ही गोळ्या घालूनही जिवंत ठेवले तुमचे विचार ….
म्हणून ……
बापू
तुम्ही आमचे आभार मानायला हवेत !

- रमेश ठोंबरे
  

Jan 30, 2015

सगळे सगळे बोलतात ….

सगळे सगळे बोलतात ….
सालं ऐकत कोणीच नाही !

जन्माला येताच रडायला लागतं बाळ !
भूक लागल्या ओठांना विद्रोह शिकवावा लागत नाही,
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

तोंडपट्टा सुरु असतो ज्याचा त्याचा येथे
कोणी उपदेश, कोणी संदेश, कोणी प्रबोधन करत असतो
कोणी इतका हावरट, कोणी इतका चिवट,
राशनच्या रांगेसमोर भाषण मारत असतो !
बोलणाराच खरच का, बोलल्या शिवाय भागत नाही ?
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

'मेरी सुनो' म्हणत कोणी आत्मप्रोढी झाडतो,
'अंतिम सत्य' म्हणत कोणी तत्वज्ञान झोडतो.
स्वभावाचा विनयभंग अन कानावरती बलात्कार,
ऐकणार्याच्या सहनशीलतेचे सगळे रेकॉर्ड मोडतो !
शेवटी गणित शुन्य अन बोलण्याचाही थांग लागत नाही !
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

याची मागणी, त्याचं धोरण, आंदोलनांचा रेटा
जाळ -पोळ,  रास्ता रोको, उपोषणाचा गोल गोटा
'ऐक ऐक' म्हणून हि जर ऐकलं नाही कोणी ….
ऐकत नाही त्याच्या खिशात, मग हजार गांधी नोटा
'तोंडावरती बोट' असं कोणीच वागत नाही !
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !
   
शिक्षणाची डिग्री घेवून दारोदार फिरतो,
'माझं ऐका' म्हणत कोणी आत्महत्या करतो.
ऐकण्यासाठी पाठवलेला …. गोल गोल बोलतो
सरते शेवटी मिळेल त्याच्या दावणीवरती चरतो.
एवढं होऊन सुद्धा कोणी शब्दाला जागत नाही.  
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

कानावरती हात ठेवून तोंड सताड उघडं
बोल बोल बोलणारचं भविष्य किती नागडं
'आधी करा … नंतर बोला' दाखवून गेलात तुम्ही
गांधी बाबा, तरी सुद्धा सुटलं नाही तागडं
हातात चरखा घेवून कोणी बडबड त्यागत नाही.  
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !      

- रमेश ठोंबरे 

Aug 18, 2014

स्वप्नातला भारत



बापू,
काल गेलो होतो नेहमीप्रमाणं एका सरकारी कार्यालयात, 
तेंव्हा स्वागताला उभ्या प्युनला पाहून
चुकल्या चुकल्यासारखं वाटलं. 
त्याचं नेहमीचं बेरकी हास्य आज निरागस झालं होतं. 
त्यानं ओळखीनं माझं हसून स्वागत केलं होतं. 

आत गेलो तर अजबच … 
अगदी बरोबर १० वाजताच सगळे कर्मचारी 
आपापल्या टेबलवर हजार होते. 
नेहमी फाईल मध्ये तोंड लपवणारे सगळे 
स्वतःहून समोर येत होते. 
"आपल्याच सेवेत हजर आहोत" 
असा संदेश त्यांचे चेहरे देत होते. 

'चौकशीच्या' खिडकीवरचे वातावरण पाहून तर गहिवर आला, 
नेहमी हिडीस फिडीस करणाऱ्या चेहऱ्याने जेंव्हा कहर केला !
म्हणाला "मी आपली काय सेवा करू शकतो ?
एखाद काम सांगितलत तर मी नक्किच लकी ठरू शकतो !"

ज्याला त्याला चढलेलं स्फुरण होतं, 
कार्यालयात अगदी चैतन्याचं वातावरण होतं. 

हवा तो कर्मचारी त्याच्याच जाग्यावर असणं, 
त्याची नजर आपल्यावर असणं, 
चुटकीसरशी फाईलच सापडणं,
लंच ब्रेकच्या आधी तिच्यावर संस्कार, सोपस्कार होणं,
मोठ्या साहेबाचं अप्रुवल येणं, 
बड्या साहेबाची सही होणं,
त्याने हसत मुखानं अगदी घरच्या सारखी चौकशी करणं, 
जाताना 'या' म्हणून निरोप देणं !

अगदीच गहिवर आला बापू, 
सगळंच कसं स्वप्नवत ! 

बापू आत्मविश्वासानं म्हणाले, 
"अरे त्यात काय एवढं …. हेच तर माझं स्वप्न होतं, 
आज स्वप्नातला भारत सत्यात आलाय" 

तर मित्र म्हणाला … 
असं काही नाही बापू, 
"कालपासून देशात भ्रष्टाचार 'लीगल' झालाय !" 


- रमेश ठोंबरे 

Jan 29, 2014

गांधी म्हणजे ...



गांधी म्हणजे तुमच्या आमच्या बापांचा बाप,
गांधी म्हणजे हिंसेवर ओढलेला चाप.

गांधी म्हणजे संयम आणि कणखरतेचा कणा,
गांधी म्हणजे जगत्गुरु तुकोबाची वीणा.

गांधी म्हणजे लोकशाहीत शांततेचा दूत,
गांधी म्हणजे स्वावलंबी चरख्यावरच सूत.

गांधी म्हणजे त्याग आणि सहिष्णुतेची मूर्ति,
गांधी म्हणजे सत्य आणि सत्याग्रहाची स्फूर्ति.

गांधी म्हणजे शांती आणि क्रांतीचा आधारस्तंभ
गांधी म्हणजे तिरंग्यातील तो़च शुभ्र रंग.

गांधी म्हणजे नेहमीच एक विचार 'नेक'
गांधी म्हणजे कधी कधी ग्यांनबाची मेख.

गांधी म्हणजे आहे एक अजब कोड़,
सोड्वायच तर सोडाच, आताशी कळलय थोड़.

गांधी म्हणजे काळाच्या भाळावरचा ठसा,*
तुम्ही आम्ही कोण कुठले, काळही पुसणार कसा ?

गांधी म्हणजे गांधीच.. त्यांना तोलणार कसं
स्वातंत्र्याचे भाष्य.. गांधीशिवाय बोलणार कसं ?

- रमेश ठोंबरे
दि. २४ मे २००९
(महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त एक जुनीच रचना)

Jan 27, 2014

प्रिय बापू

प्रिय बापू,

स.न.वि.वि. 

बापू बऱ्याच दिवसापासून विचार करतोय 
तुम्हाला पत्र लिहिण्याचा … 
समोर कागदांची भेंडोळी अन शाई भरलेलं पेन घेवून बसलोय खरा … 
पण मेंदू मात्र रिकामाच आहे. 
कदाचित मन भरून आलं कि होत असाव असं. 
परवा नेल्सन मंडेला तुमच्याकडे पोहचल्याचं कळल … 
वाटलं पत्र लिहून ठेवलं असतं तर बरं झालं असतं 
मंडेलांसोबत पाठवता तरी आलं असतं तुमच्याकड. 
यात दोन फायदे होते. 
एकतर तुमच्याच अनुयायाच्या हस्ते ते तुम्हाला मिळालं असतं 
आणि दुसरा फायदा असा कि . . . 
ते तुम्हाला खात्रीनं मिळाल असतं. 
काय आहे बापू …. 
मोठ मोठ्या शहरात हरवत चालली आहेत माणसं,
सध्या मोठ मोठ्या माणसांचेहि पत्ते सापडत नाहीत… 
खुद्द पोस्टमनला सुद्धा. 
तुमच्याकडहि असंच असणार म्हणून शंका आली. 

असो… 
देशात कुठं काही भलं बुरं घडलं कि… 
चिंता वाटायला लागते भविष्याची. 
लिहावं वाटतं एक पत्र 
सांगाव वाटतं देशाचं वर्तमान …. 
कारण हा देश तुमचा आहे, 
हे 'एक रुपया चांदी का, 
देश हमारा गांधी का !' 
म्हणण्याच्या वयापासून रुजलय मनावर. 
म्हणून जे घडतंय ते तुमच्याशी 'शेअर' करावं 
असं वाटतं बर्याचदा. 

माहित आहे मला, 
तुम्हाला हे सगळं वर्तमान समजत असेलच. 
पण संवादही व्ह्यायलाच हवेत ना ? 
म्हणून लिहायचं म्हणतोय एक पत्र !
जे विचार आहेत मनात ते येतील निदान कागदावर तरी !

विचारावरून आठवल बापू, 
गांधी विचारांना विरोध होता तेंव्हाही आणि 
विरोध होतोय आजही … 
तेंव्हाचा विचारपूर्वक असायचा … आजचा निरर्थक आहे 
आज गांधी विचारांना विरोध म्हणजे 
आधुनिकतेच लक्षण मानलं जातं, 
अन गांधी म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी 
कॉलेज कट्ट्यावरचा चेष्टेचा विषय झालाय, 
एवढाच काय तो फरक !

आज कधी चेष्टा तर फ्यशन म्हणून होत असते गांधीगिरी. 
हातात जळत्या मेणबत्त्या घेवून दिला जातो शांतीचा संदेश !
आत्मक्लेश आणि सत्याग्रह राहिला नाही आता. 
उपोषण तेवढं सुरु असतं अधून मधून …
शहरात अजीर्ण म्हणून आणि 
खेड्यात दोन वेळचं खायला मिळत नाही म्हणून.

तुम्ही म्हणाला होतात 'खेड्याकडे चला' 
खेडी बदलण्याचं तुमचं स्वप्नं ! 
पण आजची खेडी बिघडलीयत बापू …
तांबड फुटायच्या आत शेतावर निघणारा शेतकरी …. 
उन डोक्यावर येईपर्यंत हुंदडत असतो गावभर, 
अन दुपारनंतर शहरातल्या रस्त्यावर !
काय हरवलाय ? माहित नाही 
काय शोधतोय ? माहित नाही. 
शेतकऱ्यांच्या पोरांची …. 
ना खेड्याची … ना शहराची … अशी गत झालीय,
दिवसभर कुठल्यातरी झेंड्याच्या आधारावर 
कुठल्यातरी टोळी सोबत फिरत असतात … 
वर्तमान हरवल्यासारखी !

राजकारण नावाच वार सहज घुसतं डोक्यात,
जे आयुष्य मातीत गेलं तरी समजत नाही यांना. 
राजकारण करणारे राजकारण करत राहतात
देश विकून पुन्हा वरमानेन चरत राहतात. 
अन हि पोर सैरभैर फिरत असतात,
रस्ता चुकलेल्या वासरासारखी. 

राजकारण राजकारण करत असताना 
समाज … समाजकारण विसरलाय बापू, 
सत्य, अहिंसा आणि प्रेम !
हे पुस्तकातले शब्द … 
आता पुस्तकातून हि बाद होतात कि काय 
याचीच भीती वाटतेय बापू !

माणूस स्वार्थी झालाय,
समाजात राहून समाजापासून दूर पळतोय माणूस !
देशात राहून देशाला विकतोय माणूस, 
माणूस असून माणसाला फसवतोय मानून !
म्हणून चिंता वाटते मला तुमच्या देशाची, 
हो तुमच्याच देशाची … 
कारण कदाचित आजची आम्ही हा देश तुमचाच मानतो, 
आमच्या नाकर्तेपणाच खापर तुमच्या नावे फोडण्यासाठी !

पण अगदीच आणि सगळाच निराशाजनक आहे असं हि म्हणता येणार नाही, 
कारण … काही लोकांचं काम पाहिल कि, 
वाटतं याच लोकांच्या बळावर … 
करतो आहे देश थोडीफार प्रगती !
सगळा देश स्वार्थाला कवटाळून बसला असताना …. 
सगळी सगळी भौतिक सुखं नाकारून अन 
दुर्गम आणि दुर्लक्षित भागाला आपली कर्मभूमी मानून 
आयुष्य खर्ची घालतात ही लोक समाजसेवेसाठी …
तेंव्हा करावा वाटतो यांच्या कार्याला 
निदान एक नपुंसक सलाम तरी !
तशी त्यांना आशा नसतेच कशाची …. 
"आलात तर तुमच्या सोबत 
नाही आलात तर तुमच्या शिवाय" 
या एकाच जिद्दीवर सुरु असतो यांचा प्रवास …
जगाच्या रहाटगाडग्यापासून दूर, 
माणुसकी विसरलेल्या माणसांपासून अलिप्त !
हे बोलतात फक्त कृतीतून, 
ते हि स्वतःशीच, आत्ममग्न ! 

कृतीशिवाय सगळंच फोल… 
हे सांगितलत तुम्ही तुमच्या कृतीतून 
त्याचा वारसा पुढे चालवत आहेत हे लोक
अन हे माहित असताना हि 
शब्दांचे खेळ करणारा … 
माझ्यासारखा फुटकळ कवी लिहितो गांधीवादावर फक्त कविता !
सांगतो सत्य आणि असत्याच्या गोष्टी … 
सांगतो हिंसा आणि अहिंसेच्या कथा. 
निर्दयतेचा उद्रेक होतो आणि अशांतीच अराजक माजत तेंव्हा 
मांडतो पानो पानी शांती आणि करुणेच्या व्यथा. 

ज्याप्रमाणे कोणी नेता आपला भूतकाळ गुंडाळून …
चारित्र्यावर गोमुत्र शिंपडून, 
डोक्यावर गांधी टोपी घालून … 
बोलू लागतो 'गांधीवादाची भाषा' 
तुमच्या शिकवणीची, 
तुमच्या तीन माकडांच्या शिकवणीची आठवण म्हणून !

मग आम्हीहि पांढर्या शुभ्र खादीतील नेता पहिला कि,
त्याच्या भूतकाळावर बोलणं सोडून देतो,
आणि भविष्याचा वेध घेतो. 
जे दिसतं त्याला सत्य समजून स्वीकारतो आणि … 
जे कानावर पडतं ते पवित्र करून घेतो !
कारण तुमच्या माकडांची शिकवण थोडी सकारात्मक 
करून घेतली आहे आम्ही आमच्याच सोयीसाठी …!

'सकारात्मकता' हा तर तुमच्या जीवन शैलीचा एक भाग, 
म्हणून काही नाही तर निदान लिहील एक पत्र … 
आणि तेवढ्याच अधिकारांन लिहिली शेवटी …
कुठे काही असह्य घडलं कि, अन तुमची आठवण आली कि, 
तुमच्या गांधीवादावर फक्त कविता लिहिणारा … 

तुमचा,
फुटकळ कवी

- रमेश ठोंबरे 

ता.क. : डोक्यात विचारांची नव्याने जंत्री आहेच ….
शब्दांची जमवाजमव झाली कि, लिहितोच एक पत्र

Aug 7, 2013

एक वळवळणारा किडा



आज एकदाचा सोक्ष-मोक्षच लावायचाच 
असा पक्का इरादा करून …. 
सात माजली इमारतीच्या पायर्या चढून… 
गच्चीवर आलो … 
बापू आधीच पोचले होते,
माझीच वाट पाहत होते …!

माझ्या छातीचा भाता झालेला पाहून
माझ्याकडे एक कुत्सित नजर टाकून
बापूनी विचारले !
'बोल काय म्हणतोस ?'

मी धापा टाकत म्हणालो ….
"तुम्हाला काही बोलायच तर
हे अस … सातव्या मजल्यावर याव लागत…
नाहीतर त्या तिथे खाली बोलत बसलो तर …
लोक वेड्यात काढतात मला"

"कालच तो श्याम म्हणत होतो,
माझ्या बोलण्यात राम नाही म्हणे
माझं एकतर्फी बोलणं असत्य वाटतं त्याला !
तुमच्याशी माझं बोलणं असत्य ठरवतात हे लोक…

आणि तो पहा तिकडे तो नईम …
रस्त्यावरच हिंसेचा ठेला मांडून बसलाय.

द्वेष आणि इर्षा तर यांच्या जगण्याची
तत्वच बनलीत !

आणि अशांती तर प्रत्येकाच्या
डोक्यात थयथयाट करत असते.

मग मला सांगा बापू कुठे दिसतेय तुम्हाला …
सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांती ?

बापू खाली बोट दाखवत म्हणाले …
"एवढ्या दूरवरून नाही दिसणार ती.
ती तर तिथेच आहे, जिथून तू पळ काढलास ….
जिथे तू 'असत्य, हिंसा, द्वेष आणि अशांती'
पाहिलीस तिथेच तुला
'सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांती !' हि शोधावी लागेल !

मी खाली वाकून पाहू लागलो ….
शामची टपरी, नईमचा ठेला आणि विस्तीर्ण वस्ती !
थोड्या वेळाने मागे वळून पाहतो तर बापू निघून गेले होते
माझ्याच डोक्यात पुन्हा एक नवीन किडा सोडून….
आणि तो अजून हि वळवळतो आहे !

- रमेश ठोंबरे 

Aug 1, 2013

महात्म्याच्या देशात



आर्थिक मंदी, स्वीसब्यांकांची चांदी. 
कोठ्याचे भक्षक, महागाईचा राक्षक. 
नेत्यांच पोषण, बालकांचं कुपोषण. 
मंत्र्यांच भाषण, संपलेलं रेशन. 
पंचवार्षिक निवडणूक, नंतरची अडवणूक. 
देशाचा राजकारण, चरह्याईत कुरण. 
देवांची चोरी, बलात्कारित पोरी. 
पुढाऱ्याच ज्ञान, जनतेच अज्ञान
जातीची आरोळी, माजलेली टोळी. 
आरक्षनाच दुकान, दानात दान !
अनुदानावर टाच, सरकारी लाच. 
रक्तरंजित क्रांती, निस्तेज शांती.

देशाचं राजकारण तुमच्या आमच्या खिशात … 
तरीही म्हणूयात …? 
जे काही घडतंय ते … 
महात्म्याच्या देशात 

- रमेश ठोंबरे 

Oct 1, 2012

गांधी(वादी) झाल्याचं फिलिंग



१ अक्टोबर ची प्रत्येक रात्र ...
मला शांत झोपू देत नाही ...!
कितीही डोळेझाक केली तरी
वर्षभराचा लेखाजोखा डोळ्यासमोरून जात नाही.
मला आठवतात ...,
माझ्याच दैनंदिनीतील कितीतरी संदिग्ध नोंदी.
माझ्याच दैनंदिनीत झालेली सत्याची घुसमट !
असत्यावर डकवलेले ...सत्याचं पारदर्शक लेबल.

थोडस पुढं गेलं कि जाणवतो ....
वैचारिक आक्रस्ताळेपणा,
डोळ्यातून आग ओकणारी हिंसा...
आणि अवस्तावाचा ध्यास !
मला जाणवते...
मनातील अशांती, असंतोष.
आणि विचारांचा गोंधळ.

आणखी थोडं पुढं गेलं दिसतात ...
भुके-पोटी वणवण फिरणारे जीव
पाठीवरून तान्ह्याला घेवून कळवळणारी माय !
तिथेच कुठे तरी ... कधी नजर चुकवून ...
तर गर्दीचा फायदा घेवून ... माझे वळलेले पाय !

पुढे खूप काही ...
पण पुढच्या आठवणी दाबून ठेवतो ...
... कारण आता पहाट झालेली असते.
सूर्य किरणांची एक तिरीप
...हळूच खिडकीतून आलेली असते.

मी उठतो .....
सर्व विधी आवरून तय्यार होतो ...

खास आजच्या दिवसासाठी आणलेला
धोतर-पंचा महत्प्रयासाने अंगावर चढवतो.
बाहेर आलेल्या पोटाला थोडं आत ढकलतो.
... मध्ये मध्ये डोकावणाऱ्या पांढर्या केसांवर
गांधी टोपी ठेवतो.
शुभ्र पांढर्या फुलांचा एक हार हातात घेतो.
पुन्हा पोट सावरत ... कसरत करत
स्टुलावर चढतो आणि बापूंच्या फोटोला घालतो.
आता बापूंनाही कसं शांत वाटतं !
अन माझ्यातही गांधी(वादी) झाल्याचं फिलिंग दाटतं !

- रमेश ठोंबरे
(२ ऑक्टोबर २०१२)
(महात्म्याच्या कविता)

May 18, 2012

~ गांधी नंतर ~



या देशाने काय पाळले गांधी नंतर  ?
फोटोला बस हार माळले गांधी नंतर.
 
विटंबनाही रोज चालते इकडे-तिकडे  
पुतळे कसले, तत्व जाळले गांधी नंतर

देश बदलला, देशाचा गणवेश बदलला
खादीलाही नित्य टाळले गांधी नंतर

शस्त्राहुनही खणखर असते निधडी छाती
हिंसेपुढती रक्त गाळले गांधी नंतर
गांधी 'हत्या' 'वध' ठरवण्या आमच्यासाठी ?  
इतिहासाचे पान चाळले गांधी नंतर
देश आमचा गांधीवादी सांगत सुटलो, 
नथुरामाला किती भाळले गांधी नंतर ?

नको 'रमेशा' निराश होऊ कातरवेळी
'राजघाट'ने नेत्र ढाळले गांधी नंतर.

- रमेश ठोंबरे
(महात्म्याच्या कविता)

Mar 16, 2012

- गांधीगिरी -


आयुष्यभर तुम्ही केलीत ...
म्हणून आम्ही हि करतो कधी कधी.
अन आयुष्यभर दादागिरी करणारे हि ...
करतात कधी कधी ...
............................. गांधीगिरी !

तुम्ही सर्वांसाठी केलीत ...
म्हणून आम्ही हि करतो कधी कधी
अन नेहमीच सर्वाना वेठीस घरणारे हि ...
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

तुम्ही उघड उघड केलीत ....
म्हणून आम्ही हि उघडच करतो ....
अन कित्येक संसार उघड्यावर आणणारे हि
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

तुम्ही केलीत ती केलीत...
म्हणून आम्हाला हि करावी लागली ...
अन ज्यांना करायची नव्हती कधीच ....ते हि
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

गांधीगिरी ....
कधी भीती,
कधी मुरलेली राजनीती.
कधी ढोंग,
कधी समाजसेवेचा कोंभ.

कधी भास,
कधी टाकलेला फास.
कधी माज,
कधी लोपलेला आवाज.
....
गांधीगिरी ...
...................
..................
तुम्हाला समजली....
पण आम्हाला कधी समजणार ....?
गांधीगिरी ...!

- रमेश ठोंबरे


Oct 2, 2011

एक महात्मा पाहिजे आहे ! (जाहिरात)





















आमच्यासाठी कष्ठ सोसणारा,
आमच्या सर्व देशाला पोसणारा.
खोट्याच्या दुनियेत सत्याचा आग्रह धरणारा,
आमच्या पोटासाठी स्वतः उपोषण करणारा.
एक महात्मा पाहिजे आहे !

आमच्यासाठी चरख्यावर सुत कातणारा,
आम्हा सर्वाना अहिंसेचा दूत वाटणारा.
जगाला मानवतेचा संदेश देणारा,
सत्य अहिंसा आणि शांतीच गीत गाणारा
एक महात्मा पाहिजे आहे !
.
.
.

पण लक्षात ठेवा .....
देशाच काम फुल-टाईम करावं लागेल,
सांगता येत नाही इथं कोण कसा वागेल.
सत्य सत्य म्हणून खोटच पेरलं जायील,
येणाऱ्या पिकालाहि मग गृहीत धरला जायील.

इथे पावलो पावली लढावं लागेल,
मनालाही कधी कधी गाढावं लागेल.
कधी वाटेल सोडून द्यावी सत्याची वाट,
तेव्हा स्वताच स्वतः च मन मोडावं लागेल.

तुमच्या प्रत्येक गोष्टीत मग काढल्या जातील खोड्या,
शब्दांच्या कसरती अन शब्दांच्या कुरघोड्या.
भेकड, पळकुटा म्हणून हेटाळनीही केली जायील.
तुमच्या नावाची मग सुपारीही दिली जायील,

तुम्ही म्हणाल एवढ करून सुद्धा मरण सस्ते,
पण तुम्ही गेल्यावर तुमच्या नावें होतील रस्ते.
चौका-चौकात तुमचे पुतळे उभारले जातील,
जयंती मयन्तीला सगळे तुमचे गुण गातील.

गेल्यावर हि नेहमीच ....
अपमान हि सहन करावा लागेल,
काळ्या कावळ्याचं तुमच्या काठीशिवाय कस भागेल ?
तुमचे विचार सोडून तुमच सर्व सर्व पळवल जाईल,
एखादा मग तुमचा तो चष्मा हि वरचे वर नेईल.

सरकारी कार्यालयात तुमची व्यवस्था असेल,
सोबतीला मात्र भिंतींशिवाय कुणीच नसेल.
सगळा बाजार समोर दिसेल, पैश्यावरच न्याय असेल
पण तेव्हा तुम्हाला पाहण्या शिवाय पर्याय नसेल.

गेल्यानंतर मागचा विचारच नको,
कोणी मूल्य, कोणी तुमच्या वस्तू विको,
नंतर मागून काहीच बोलायचं नाही..
आतल्या-आतूनही उगाच हलायचं नाही.
गेल्यावर तुमची किंमत ती काय ?
गरज सरो अन वैद्य जाय !


थोडक्यात ...
तुम्हाला सत्य स्वीकारावं लागेल,
देशासाठी खपाव लागेल.
उपोषण आणि सत्याग्रह य्याना शस्त्र म्हणून स्वीकारावं लागेल.
राजकारणाला सहन कराव लागेल,
राजकारण आवडत नसल तरी 'राजकारणी' ...
म्हणलेल एकून घ्यावं लागेल.
तुम्हाला एख्याद्या हि चुकीसाठी माफ केल जाणार नाही ...
(कारण तुम्ही 'महात्मा' असणार आहात ...)
उलट तुमच्यातील दोष हेरले जातील ... !
तुमच्या चांगल्या गोष्टीत हि उणीव असल्याची जाणीव ... (साक्षात्कार)
आम्हाला वेळोवेळी होत राहील.
आम्हाला हव तोपर्यंत तुम्हाला सहन केल जायील....,
नंतर मात्र तुम्हाला संपवण्याची वेळ येयील ... !
तेव्हा तुम्ही गप गुमान 'राम' म्हणायच.

या नंतरच तुमचा खरा सूड आम्ही घेऊ
गेलात म्हणून सोडून कसे देऊ ?
तुमच्यातील उनिवाना उधान येईल ....,
तुमच्या नाकार्तेपणावर संशोधन होईल.
गेलात मेलात ..... संपले असे नाही .... !
दररोज मारले जाल !
.
.
.
.
कबूल असेल तर आजच apply करा,
'महात्म्याची' Post बर्याच दिवसापासून खाली आहे .. !
कृपया Fax किंवा Mail करू नका Online हि भेटू नका ...
प्रत्यक्ष Offline भेटा ......
आम्हाला वर दिलेल्या सर्व Qualities चेक करायच्या आहेत.
आणि काही Policies प्रत्यक्ष ठरायच्या आहेत.


- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Sep 30, 2011

दादागिरी ते गांधीगिरी (व्हाया सेंट्रल जेल)

तो झोपड़पट्टीत रहायचा ...
अन मिल्लेनिअमची स्वप्न पहायचा.
देश्याचे नेते दिल्लीत पाणी प्रश्नासाठी बोलायचे ..,
हा गल्लीत पाण्यासाठी भांडायचा.

दादा दादांची टक्कर होताच ..
हा गुह्नेगारित उतरला
खंडनी, हप्प्ता वसूली करतानाच ...
आता चाकू ही हातात धरला.

गुह्नेगारी वाढत गेली, दादागिरी वाढत गेली....
डाकूगिरी, गुंडागिरीत हा कधीच नाही हरला.
आत - बाहेरचा खेळ खेळ्ताना अखेर ...
एक दिवस सौंशयित दहशतवादी ठरला.

जामिन आता मिळत नव्हता, तुरंगवास टळत नव्हता...
तेंव्हा सापडले त्याला गंधिवादाचे घबाड.
'माझे सत्याचे बोल' ... टाइमपास म्हणुन हाती घेतले..
अन वाचता वाचता त्याने सम्पूर्ण गांधिच वाचले.

काय असतो गुह्ना, का द्यावी गुह्न्याची कबूली ?
दादाच्याही डोक्यात गांधीगिरी सुरु झाली.
दिली लगेच कबूली, भोगला त्याने तुरुंगवास,
चार वर्ष्यांची शिक्षा ठरली पुस्तकांचा सहवास.

आता तो बदललाय.., गाँधी वाचून हललाय,
गाँधी विचार आचारतो, गांधीगिरी प्रचारतो.
तुरुंगातील कैध्याना तो आज विचारांची दिशा देतो,
गाँधी विचार जिवंत आहेत याचीच एक आशा देतो.

चाकू धरल्या हातानी... आता चरखा ही शिक्लाया,
त्याने स्ववलम्बनासाठी... नौकरी वर विश्वास टाकलाय.
पहिला जर 'लक्ष्मनदादा' आता विश्वास कसा बसेल,
कारन चाकू धरल्या हातामधे आता नवे पुस्तक दिसेल.

- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
दि. २०/०५/२००९

(सत्येकथेवर आधारित)

Sep 13, 2011

निषेध


आम्हाला वेळोवेळी डिवचलं जातंय
कधी आमच्या भागात केली जाते घूसखोरी
तर कधी पळवल जातं आमचं विमान
कधी उडवल्या जातात आमच्या सैनिकांच्या छावण्या
तर कधी केला जातो बुद्ध मुर्तिंचा अवमान.
पण आम्ही शांत आहोत.
आमचा देश शांत आहे !

तलवारींनी केल जातंय शिरस्तान
अन तोफानी घेतले जातात हजारो निरापराध्यांचे प्राण .
मारतानाही केला जातो अमानुष विचार,
अन हिंसेलाही लाजवतिल असे भयानक अत्त्याचार.
तरीही आम्ही शांत आहोत...
आमचा देश शांत आहे ...!
आमचा देश अहिंसक आहे !

पाकिस्तान कुरापती काढतो आहे,
चीन ही कधी कधी लढतो आहे ..
आणि आता तर ..
ज्यांचे नावही नकाश्यावर लवकर सापडणार नाही ..
असे ही करत आहेत उघड - उघड हल्ले.
आम्ही त्याना उत्तर देतो..
पाठवतो एखाद प्रेमपत्र.
आमचा प्रेमाचा संदेश
आमच्या देशाचा प्रेमाचा संदेश !

एवढ सगळ झाल्यावर ....
आम्ही धरतो आग्रह.... सत्याचा....,
आम्हालाच गिळंकृत करू पाहणाऱ्या
महासत्ताक दलालांकडे.
त्यांच्या समोर मांडतो सगळ सत्य...!
अन करतो सत्याग्रह.

डीवचतानाही शांत राहतो.
हिंसेत ही अहिंसा पाळतो
द्वेष करणार्यांना प्रेम-पत्र देतो
आणि नेहमी सत्याचा आग्रह धरतो.
अन झाल्याप्रकाराबद्दल खुपच संताप आला तर ...
पत्रकार परिषद् बोलावून,
भिंतीवर निरागस हास्य करत लटकना-या...
महात्म्याच्या साक्षीने
व्यक्त करतो तीव्र निषेध !

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre)