Jul 31, 2014

--- निष्कर्ष ---


काळ इतका सोकावलाय कि,
वाटतं, एक दिवस …
उलथा पालथ होईल साऱ्या विश्वाची,
काहीच खुणा उरणार नाहीत अस्तित्वाच्या.
भूगर्भात नाहीशी होईल संपूर्ण मानवजात,
हजारो, लाखो, करोडो … आणखी कितीतरी वर्षासाठी.

पुढे कधीकाळी पुन्हा होईल उत्खनन,
त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पुरातत्व विभागाकडून,
हडप्पा आणि मोहन्जोधडो च्या धर्तीवर.

मानवाच्या शरीराचे अवशेष नष्ट झालेले असतील
तेंव्हा सापडतील फक्त खोल खोल इमारतींची,
अस्ताव्यस्त शहरं.
पुतळ्यांचे खोल खोल चौथरे,
त्याखाली आणखी खोल विस्तीर्ण चौक ….
चौकापासून पळत सुटलेले अतिक्रमित रस्ते …
आणि चौथऱ्यापासून विलग होऊन बाजूलाच पडलेले,
हात, पाय अन काठी तुटलेले …
निराधार, निराश्रित, असहाय्य दगडांचे कितीतरी पुतळे.

तेंव्हा संशोधनाचा एक भाग म्हणून ….
आपल्याच पूर्वजांचे अस्तित्वाच्या खुणा शोधण्यासाठी,
जमा केले जातील सगळ्या पुतळ्यांचे जीर्ण अवशेष,
आणि अभ्यासपूर्वक काढले जातील काही निष्कर्ष !

"इ.स.न. अमुक अमुक वर्षांपूर्वी,
पाषाण युगात वावरत होती उंचच उंच,
दगडाचं काळीज घेवून फिरणारी दगडाची माणसं,
ज्यांनी निसर्गाशी स्पर्धा करून …
गिळंकृत केला निसर्ग आणि,
ओढवून घेतला पाषाण युगाचा अंत !"

- रमेश ठोंबरे

Jul 30, 2014

दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं

दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं
हे शहर सुस्तावलकी,
मला आठवते गावाकडची ….
पहिल्या पावसातली लगबग.

शहरातले रस्ते पावसात निर्जन झालेले असतात
अन गावाकडचे रस्ते
ओसंडून वाहत असतात,
पहिल्या पावसाने सुखावलेल्या उत्साही मनासकट !

शहरातल्या रस्त्यांवर उडत राहतात
नव्या कोऱ्या कडक इस्त्रीला डागाळणारे शिंतोडे
अन गावच्या चिकनमातीत रुतत जातात
गुडघ्यापर्यंत पाय विनातक्रार.

शहराला कौतुक  ….
डांबरी रस्ते भिजवणाऱ्या स्वच्छ पावसाचं
अन गावाला आस
बांध फोडून वाहणाऱ्या मातीमिश्रीत गढूळ पाण्याची.

शहरातल्या नाल्यात
गुदमरतो पाण्याचा जीव
अन गावच्या नदीत मोकळे होतात
निपचित पडलेले अगणित श्वास

दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं
गोठ्लेल्या मनाला फुटू लागतात घुमारे
अन विद्रोही मन भटकत राहत एकटच माळरानावर ….
द्विधेत असलेल्या शरीराशिवाय
निस्संकोच   !

- रमेश ठोंबरे








 




   

Jul 22, 2014

बरकत व्हती हिरीच्या पाण्याला


गावकीच्या हिरीवर सारं गाव पाणी भरायचं
आन हिरीचं पाणी आजूबाजूच्या साऱ्या पिकाला पुरायचं
कुई कुई आवाज काढत दिवसभर मोट चालायची ….
पाटापाटानं निघालेलं पाणी शेवटच्या ताटापस्तोर पोचायचं.
खाली बायका सकाळ-संध्याकाळ पोहऱ्यानं पाणी भरायच्या,
हिरीच्या पाण्याचं घागरभरून कौतुक करायच्या.  

आजी म्हणायची,
"बरकत हाय मोटंच्या पाण्याला,
ह्या हिरीन कधी दावला नाही तळ,
आजपर्यंत कधी मोट झाली नाही उपडी
आन हिरीवर गेलेला पोहरा कधी आला नाय रिता.
बरकत हाय हिरीच्या पाण्याला !"

आजी गेली त्या वरसाची गोष्ट ….
हिरीवर मोटंच्या जागी मोटार आली,
आन एका मोटरीच्या पुढं कितीतरी मोटारी झाल्या.
पाटाच पाणी तोंड लपवून पाईपामधून सुसाट पळू लागलं,
बायकांना घरबसल्या नळाच पाणी मिळू लागलं !

थारोळ्यावर मोट उपडी झाली,
पोहरा घरच्या वळचणीला पडला,
परंपरेन आधुनिकतेवर तळतळाट ठेवला
अन गावकीच्या विहिरीनं
कधी नाही तो तळ दावला !

पुढं दरवर्षी हिरीवरच्या मोटारीचा कर्नकर्शक आवाज ऐकला कि,
आजी ढगातून कन्हायची  ….

"बरकत व्हती मोटंच्या पाण्याला,
ह्या हिरीन कधी दावला नव्हता तळ,
कधी मोट झाली नाही उपडी आन
हिरीवर गेलेला पोहरा कधी आला नव्हता रिता.
बरकत व्हती हिरीच्या पाण्याला !"

- रमेश ठोंबरे

Jul 17, 2014

ओटी


अर्धा पावसाला संपला तरी
जमीन पुरती ओली झाली नव्हती,
पुढं पाऊस येईल याची हि खात्री नव्हतीच,
तरीही बापाची सकाळ पासून लगबग सुरु होती
मोठ्या उत्साहानं तिफनीची पूजा करत होता,
अर्धओल्या मनात भविष्याची हिरवी स्वप्न पेरत होता.

हळदी कुंकवाच ताट घेवून उभ्या
आईला मी विचारलं,
"घरात खायला दाना नाही,
पाऊस पडण्याची कसलीच आशा नाही…
मग आहे त्यावर पाणी सोडून …
कशाला हे येड्यागत भिकेचे डोहाळे ?"

आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,
"तुला नाही कळणार पोरा,
या येडेपणा मागचं शहाणपण,
शेतकऱ्याला पाहवत नसतं
त्याच्या काळ्या आईचं रितेपण !

पायाला माती लागल्याबिगर तुला
समजणार नाही धरतीच स्थान …

आरं नेहमीच फळाची आशा करून नाही चालत,
कधी कधी मानावं लागतं,
धरतीची ओटी भरण्यात हि समाधान !"

- रमेश ठोंबरे
(माझ्या आई साठी … )

 


     
   

Jul 14, 2014

- दुष्काळ -



ही रखरखलेली धरती
हे डोंगर ओके बोके
हा तहाणलेला वारा
हे भरकटलेले झोके

हे ढोर कधीचे फिरते
शोधात भुकेच्या पोटी
हा थवा इथे पक्षांचा …
भिजवीत कोरड्या चोची

दुष्काळ पसरला आहे
पण बोलत नाही कोणी
आवाज नदीचा गेला
अन झिरपून गेले पाणी

हे पाझरलेले मडके
का असे अचानक फुटले ?
या उजाड सायंकाळी
हे बंध कुणाचे तुटले ?

हे पिंडदान कोणाचे ?
वरदान कुणाला ठरले ?
ही काक गर्जना झाली
आभाळ ढगांनी भरले
.
.
.
पाऊस कधीचा पडतो …
धगधगत्या सरणावरती
हे प्रेत कुणाचे जळते
अवसेच्या भयाण राती ?

- रमेश ठोंबरे 

Jul 9, 2014

ओझं


हि कसली भूक आहे या शहरांची 
गिळंकृत करू पाहत आहे सगळा निसर्ग

हि कसली स्पर्धा सुरु आहेत इथल्या इमारतींची ?
उंचच उंच वाढत आहेत 
आभाळाच्या पोटात शिरत आहेत 
अन अजगरासारख्या पसरत आहेत
मोठ मोठे डोंगर पोटात घेत ! 

हा कसला विकास आहे … निरर्थक !
भकास, बकाल आणि निराधार होत आहेत
इथली स्वयंपूर्ण खेडी,
शहरांच्या छत्रछायेत !

आपला गुणधर्मच विसरलेले
हे कसले या शहरातले वांझोटे ऋतू

आणि हे कसलं
अशाश्वत ओझं
डोक्यावर घेवून फिरतो आहे मी …
या शाश्वत जगात
वर्षोनुवर्ष !

- रमेश ठोंबरे