Showing posts with label मुक्त छंद. Show all posts
Showing posts with label मुक्त छंद. Show all posts

Feb 21, 2015

बापू, तुम्ही आमचे आभार मानायला हवेत


बापू
तुमचा जन्मदिन आम्ही मर्यादित ठेवला
सरकारी कार्यालयापुरता  ….
अन सामाजिक भान म्हणून ….
'राष्ट्रपित्याला विनम्र अभिवादन !'
म्हणत वर्तमान पत्रातील एका कोपऱ्यापुरता.

आम्ही तो रुजू दिला नाही जनमानसात.
कारण …
मग त्याचा झाला असता उत्सव.
… तुमच्या प्रतिमेला हार घालून ….
निघाल्या असत्या चौका-चौकातून मिरवणुका.
'ड्राय डे' दिवशीही झींगली असती तरुणाई.

डीजे वर वाजणाऱ्या 'चिकण्या चमेलीवर'
तर्राट झुंडीन धरला असता ताल .
अन मुजोर वादळात उडाला असता कुणाशीचा झगा
तुमच्याच मिरवणुकीत तुमच्या समोर !

बापू
आमचे आभार माना
खंत करू नकात,
'सरकारी भिंतींशिवाय, कोणीही तुमच्या पाठीशी नसल्याची'
हरिजन, गिरीजन, बहुजनाच्या देवासारखे
कोण्या एकट्याचे नाही आहात तुम्ही !
 
आम्ही, तुम्हाला म्हणतो,  
बापू, राष्ट्रपिता अन महात्माही,
पण देवत्व कधीच बहाल केलं नाही तुम्हाला
कारण तुम्हाला देव्हाऱ्यात बसवलं असतं तर
मग आशाचं मावल्या असत्या
पुन्हा 'गांधी' जन्माला घालण्याच्या !

बापू
तुम्ही आमच्यासाठी सामान्य
म्हणूनच आम्ही दाखवू शकतो तुमचे दोष,
काढू शकतो तुमच्या शिकवणीतील उणीवा
कट्ट्यावर बसून देवू शकतो शिव्या
अन अहिंसा शिकवणाऱ्या कृश देहावर …
झाडू शकतो गोळ्याही बिनधास्त  !
. .
. .
. .
. .
. .
आम्ही होवू दिले नाहीत जयंतीचे उत्सव …
आम्ही बहाल केलं नाही तुम्हाला देवत्व,
आम्ही गोळ्या घालूनही जिवंत ठेवले तुमचे विचार ….
म्हणून ……
बापू
तुम्ही आमचे आभार मानायला हवेत !

- रमेश ठोंबरे
  

Jan 27, 2014

प्रिय बापू

प्रिय बापू,

स.न.वि.वि. 

बापू बऱ्याच दिवसापासून विचार करतोय 
तुम्हाला पत्र लिहिण्याचा … 
समोर कागदांची भेंडोळी अन शाई भरलेलं पेन घेवून बसलोय खरा … 
पण मेंदू मात्र रिकामाच आहे. 
कदाचित मन भरून आलं कि होत असाव असं. 
परवा नेल्सन मंडेला तुमच्याकडे पोहचल्याचं कळल … 
वाटलं पत्र लिहून ठेवलं असतं तर बरं झालं असतं 
मंडेलांसोबत पाठवता तरी आलं असतं तुमच्याकड. 
यात दोन फायदे होते. 
एकतर तुमच्याच अनुयायाच्या हस्ते ते तुम्हाला मिळालं असतं 
आणि दुसरा फायदा असा कि . . . 
ते तुम्हाला खात्रीनं मिळाल असतं. 
काय आहे बापू …. 
मोठ मोठ्या शहरात हरवत चालली आहेत माणसं,
सध्या मोठ मोठ्या माणसांचेहि पत्ते सापडत नाहीत… 
खुद्द पोस्टमनला सुद्धा. 
तुमच्याकडहि असंच असणार म्हणून शंका आली. 

असो… 
देशात कुठं काही भलं बुरं घडलं कि… 
चिंता वाटायला लागते भविष्याची. 
लिहावं वाटतं एक पत्र 
सांगाव वाटतं देशाचं वर्तमान …. 
कारण हा देश तुमचा आहे, 
हे 'एक रुपया चांदी का, 
देश हमारा गांधी का !' 
म्हणण्याच्या वयापासून रुजलय मनावर. 
म्हणून जे घडतंय ते तुमच्याशी 'शेअर' करावं 
असं वाटतं बर्याचदा. 

माहित आहे मला, 
तुम्हाला हे सगळं वर्तमान समजत असेलच. 
पण संवादही व्ह्यायलाच हवेत ना ? 
म्हणून लिहायचं म्हणतोय एक पत्र !
जे विचार आहेत मनात ते येतील निदान कागदावर तरी !

विचारावरून आठवल बापू, 
गांधी विचारांना विरोध होता तेंव्हाही आणि 
विरोध होतोय आजही … 
तेंव्हाचा विचारपूर्वक असायचा … आजचा निरर्थक आहे 
आज गांधी विचारांना विरोध म्हणजे 
आधुनिकतेच लक्षण मानलं जातं, 
अन गांधी म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी 
कॉलेज कट्ट्यावरचा चेष्टेचा विषय झालाय, 
एवढाच काय तो फरक !

आज कधी चेष्टा तर फ्यशन म्हणून होत असते गांधीगिरी. 
हातात जळत्या मेणबत्त्या घेवून दिला जातो शांतीचा संदेश !
आत्मक्लेश आणि सत्याग्रह राहिला नाही आता. 
उपोषण तेवढं सुरु असतं अधून मधून …
शहरात अजीर्ण म्हणून आणि 
खेड्यात दोन वेळचं खायला मिळत नाही म्हणून.

तुम्ही म्हणाला होतात 'खेड्याकडे चला' 
खेडी बदलण्याचं तुमचं स्वप्नं ! 
पण आजची खेडी बिघडलीयत बापू …
तांबड फुटायच्या आत शेतावर निघणारा शेतकरी …. 
उन डोक्यावर येईपर्यंत हुंदडत असतो गावभर, 
अन दुपारनंतर शहरातल्या रस्त्यावर !
काय हरवलाय ? माहित नाही 
काय शोधतोय ? माहित नाही. 
शेतकऱ्यांच्या पोरांची …. 
ना खेड्याची … ना शहराची … अशी गत झालीय,
दिवसभर कुठल्यातरी झेंड्याच्या आधारावर 
कुठल्यातरी टोळी सोबत फिरत असतात … 
वर्तमान हरवल्यासारखी !

राजकारण नावाच वार सहज घुसतं डोक्यात,
जे आयुष्य मातीत गेलं तरी समजत नाही यांना. 
राजकारण करणारे राजकारण करत राहतात
देश विकून पुन्हा वरमानेन चरत राहतात. 
अन हि पोर सैरभैर फिरत असतात,
रस्ता चुकलेल्या वासरासारखी. 

राजकारण राजकारण करत असताना 
समाज … समाजकारण विसरलाय बापू, 
सत्य, अहिंसा आणि प्रेम !
हे पुस्तकातले शब्द … 
आता पुस्तकातून हि बाद होतात कि काय 
याचीच भीती वाटतेय बापू !

माणूस स्वार्थी झालाय,
समाजात राहून समाजापासून दूर पळतोय माणूस !
देशात राहून देशाला विकतोय माणूस, 
माणूस असून माणसाला फसवतोय मानून !
म्हणून चिंता वाटते मला तुमच्या देशाची, 
हो तुमच्याच देशाची … 
कारण कदाचित आजची आम्ही हा देश तुमचाच मानतो, 
आमच्या नाकर्तेपणाच खापर तुमच्या नावे फोडण्यासाठी !

पण अगदीच आणि सगळाच निराशाजनक आहे असं हि म्हणता येणार नाही, 
कारण … काही लोकांचं काम पाहिल कि, 
वाटतं याच लोकांच्या बळावर … 
करतो आहे देश थोडीफार प्रगती !
सगळा देश स्वार्थाला कवटाळून बसला असताना …. 
सगळी सगळी भौतिक सुखं नाकारून अन 
दुर्गम आणि दुर्लक्षित भागाला आपली कर्मभूमी मानून 
आयुष्य खर्ची घालतात ही लोक समाजसेवेसाठी …
तेंव्हा करावा वाटतो यांच्या कार्याला 
निदान एक नपुंसक सलाम तरी !
तशी त्यांना आशा नसतेच कशाची …. 
"आलात तर तुमच्या सोबत 
नाही आलात तर तुमच्या शिवाय" 
या एकाच जिद्दीवर सुरु असतो यांचा प्रवास …
जगाच्या रहाटगाडग्यापासून दूर, 
माणुसकी विसरलेल्या माणसांपासून अलिप्त !
हे बोलतात फक्त कृतीतून, 
ते हि स्वतःशीच, आत्ममग्न ! 

कृतीशिवाय सगळंच फोल… 
हे सांगितलत तुम्ही तुमच्या कृतीतून 
त्याचा वारसा पुढे चालवत आहेत हे लोक
अन हे माहित असताना हि 
शब्दांचे खेळ करणारा … 
माझ्यासारखा फुटकळ कवी लिहितो गांधीवादावर फक्त कविता !
सांगतो सत्य आणि असत्याच्या गोष्टी … 
सांगतो हिंसा आणि अहिंसेच्या कथा. 
निर्दयतेचा उद्रेक होतो आणि अशांतीच अराजक माजत तेंव्हा 
मांडतो पानो पानी शांती आणि करुणेच्या व्यथा. 

ज्याप्रमाणे कोणी नेता आपला भूतकाळ गुंडाळून …
चारित्र्यावर गोमुत्र शिंपडून, 
डोक्यावर गांधी टोपी घालून … 
बोलू लागतो 'गांधीवादाची भाषा' 
तुमच्या शिकवणीची, 
तुमच्या तीन माकडांच्या शिकवणीची आठवण म्हणून !

मग आम्हीहि पांढर्या शुभ्र खादीतील नेता पहिला कि,
त्याच्या भूतकाळावर बोलणं सोडून देतो,
आणि भविष्याचा वेध घेतो. 
जे दिसतं त्याला सत्य समजून स्वीकारतो आणि … 
जे कानावर पडतं ते पवित्र करून घेतो !
कारण तुमच्या माकडांची शिकवण थोडी सकारात्मक 
करून घेतली आहे आम्ही आमच्याच सोयीसाठी …!

'सकारात्मकता' हा तर तुमच्या जीवन शैलीचा एक भाग, 
म्हणून काही नाही तर निदान लिहील एक पत्र … 
आणि तेवढ्याच अधिकारांन लिहिली शेवटी …
कुठे काही असह्य घडलं कि, अन तुमची आठवण आली कि, 
तुमच्या गांधीवादावर फक्त कविता लिहिणारा … 

तुमचा,
फुटकळ कवी

- रमेश ठोंबरे 

ता.क. : डोक्यात विचारांची नव्याने जंत्री आहेच ….
शब्दांची जमवाजमव झाली कि, लिहितोच एक पत्र

Jan 5, 2014

बेड्या



तुझ्या पायात भिंगरी आहे 
दिवसभर घरात गर गर फिरण्यासाठी.
तुझ्या पायात बांधले आहेत चाळ,
घरात घरात फक्त आमच्या मर्जीखातर नाचण्यासाठी,
आम्हाला काय हवं ... काय नको ते पाहण्यासाठी.
घरातल्या घरात घरभर गर गर फिरत जा.
घरातल्या घरात आमच्या तालावर नाचत जा !
यातच तुझं भलं आहे ....
आणि समाजाचं ही !

तू कधी विद्रोहाचा विचार ही करू नकोस
कारण तुझ्या दुसर्या पायात ...
आम्ही ठोकल्या आहेत बेड्या ... संस्कृतीच्या.
आता तूच ठरव ...
त्या तोडायच्या आहेत तुला ?
तोडायच्या तर खुशाल तोड ...
पण त्या आधी ध्यानात ठेव ....
तुझ्या पायातील या संस्कृतीच्या बेड्या तू तोडल्यास तर ...
तुला रस्त्या रस्त्यावर जे दिसेल ...
ते कदाचित आजच्यापेक्षा किती तरी जास्त विदारक असेल.

- रमेश ठोंबरे 

Oct 27, 2013

तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये …


तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये … 
आभाळ जिथ धरतीला टेकलंय ते आभाळ पाहून ये. 
घाई करू नकोस, 
कुठल्याही निष्कर्षाला पोहचण्याची …
जगण्याचा वेग थोडा मंद कर … 
धावू नकोस नुसताच … 
जगून घे !

कुठल्याच गोष्टी नसतात अंतिम सत्य …
त्यांनी लिहून ठेवलंय म्हणून स्वीकारायचं, 
अन मला पटत नाही म्हणून नाकारायचं. 
याला काय म्हणायचं ? 

घाई करू नकोस, 
अनुभवाच्या कसोटीवर घासून घे 
तुझ्या सद्सद विवेक बुद्धीने तपासून घे !

मन सुद्धा बोलतं कधी कधी सत्य,
त्यात हि मानत जा तथ्य !
मात्र त्याच्यावर हवा थोडा लगाम …
कारण थोडी मोकळीक दिलीस तर धावेल बेफाम !
मन कधी आपलं तर … कधी परकं,
कधी देतं साथ तर कधी लाथ हि !

म्हणून थोडा वेळ जावू दे … 
घाई करून नकोस … सबुरीने घे !
कारण कधी कधी आपण ज्याला अंतिम सत्य मानतो …
त्यात होत असतात बदल,
नवी दिशा मिळाली कि, 
बदलतात व्याख्या 
बदलतात संदर्भ 
बदलतात विचार ! 
म्हणून थोडा वेळ दे …
तू दूर क्षितिजापर्यंत जावून ये … 
आभाळ जिथ धरतीला टेकलंय ते आभाळ पाहून ये. 

- रमेश ठोंबरे 
www.rameshthombre.com