Oct 14, 2013

"मनाच्या काठावरून"... मन-गाभाऱ्यात ...


'मन' या विषयावर कितीतरी साहित्य आजपर्यंत अनेक भाषांमध्ये आले आहे आणि येतच आहे. "मन म्हणजे न सुटणारा गुंता तर कधी उलगडता उलगडता कोड्यात टाकणारे कोडे, ज्याचा थांग विज्ञानालाहि लागला नाही ! मन म्हणजे कोणासाठी कुतूहलाचा, तर कोणासाठी संशोधनाचा विषय. जिथ कित्येक पुस्तकांचा वाचून चोथा करणाऱ्या शिक्षिताला मनाच्या आसपास हि भटकता येत नाही तिथ बहिणाईसारख्या जिवनाच तत्वज्ञान जगण्याच्या शाळेत शिकणाऱ्या, तुमच्या आमच्या दृष्टीने अशिक्षित असणार्या कवियत्रीला मनाचा थांग लागतो !

परवाच्या डोंबिवली मेळाव्यात Manisha Silam 'मनीषा सिलम' यांचा 'मनाच्या काठावरून' या कविता संग्रह हातात पडला. मुखपृष्टाच देखणेपण आधीचा मनात भरलं होतं आणि आत्ता संग्रह वाचण्याची उत्सुकता होती…!

'काठावरून डोहात उतरताना ….' असे शीर्षक असलेली 'अशोक बागवे' यांची अतिशय बोलकी प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे, प्रस्तावना वाचतानाच आपल्या हातात कवियत्रीने कुठल्या आशय आणि विषयाच्या कविता ठेवल्या आहेत आणि त्याचा दर्जा काय असणार आहे याची काल्पना येते. 

एकूण ४९ रचनांमधून मनीषा सिलम यांनी मनाचे पदर उलगडण्याचा प्रयत्न या कवितासंग्रहात केला आहे. 'अपूर्णता' या रचनेत त्या सुरवातीलाच म्हणतात …. 
'प्रत्येक अपूर्णतेला पूर्णत्वाची आस आहे 
खर तर पूर्णत्व हाही एक भासच आहे !' … किती बोलक्या ओळी आहेत या 
कवियत्री पुढे सांगते कि, सगळ्याच गोष्टी पूर्ण करायच्या नसतात… कारण अपुर्नतेलाहि एक वेगळ मोल असत.

'कैफ' नावाच्या कवितेत कैफ फक्त सुखाचाच नसतो तर दु:खाचाहि एक कैफ असतो , म्हणूनच आपण बर्याचदा आपलं दु:खच गोंजारत बसतो. कारण ते सेफ आणि चिरंतर आहे !

'मनातलं मुल' हि कविता अतिशय सुंदर आहे, मला आवडली ! 
कारण ती वाचताना मला माझ्याच एका कवितेतील ओळी नकळत आठवल्या 
" तुमच्या आमच्या मनात 
एक तान्ह मुल रांगत असतं, 
मी अजून लहान आहे … 
हेच नव्याने सांगत असतं" 
आणि या सोबतच आठवली पाडगावकरांची जिप्सी हि रचना !
आपल्या मनात लपलेल लहान मुलाच निष्पाप मन याच वर्णन करून 'ज्यांन त्यानं जपावं आपल्यातलं लहान मुल' असा अतिशय मोलाचा सल्ला हि कविता देते.

'नरक' या कवितेत संवेदनशील मनाची घुसमट मांडली आहे, समाजसेवेच्या नावाखाली, हार तुरे मिरवणारे नेते असोत कि सामाजिक कार्यकर्ते किंवा सिग्नल वर एखादा आशाळभूत चेहरा पाहून त्याच्या हातावर दोन रुपयाचे नाणे ठेवणारा सामान्य मानूस …आपल्या सगळ्याची समाजसेवा हि याचा मार्गाने जाते आणि इथेच संपते. आपल्याच सारखे काही विचारवंत यावर पानभर लेख लिहितात किंवा प्रसवतात एखादी वांझोटी कविता, जी कधीच यांच्यापर्यंत पोचत नाही, खावू च्या खालचा कागद होवून ! त्यामुळे कवियत्री इथे एक व्यथा मांडते कृतीशिवाय होत असलेल्या प्रयत्नाची, हि कविता आहे त्या भुकेल्या जीवनासाठी, ज्यांच्यासाठी मुलभूत गरजा भागवणे हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. इथे कवियत्री नकळत जेंव्हा दोन सामाजिक स्तरावर जावून तुलनात्मक विचार करू लागते तेंव्हा, तिला एकीकडे दिसतात भुकेसाठी वणवण करणारी कोवळ्या वयात कामाला लागलेली हात, तर दुरीकडे दुधातुपात न्हाणारी उच्चभूंची लेकरं ! आणि हे सगळ कवियत्री अतिशय कमी शब्दात आणि समर्पक रित्या मांडते हेच या रचनेच वैशिष्ट्य आहे. 

पुन्हा एकदा पाडगावकर माझ्या मनात डोकावतात (कवियत्रीच्या मनात डोकावले असतील का ?) जेंव्हा मी …. 
"आयुष्य कस ? 
ज्याला जसं 
उमगलं तसं … " या ओळी वाचतो 
वेगळ्या फोर्म मधली कविता आहे, आयुष्याविषयीचे तत्वज्ञान अगदी सोप्या आणि मोजक्या शब्दात मांडते हि कविता. 

'शाप' 
हि इन-मीन दहा ओळींची कविता … पुन्हा एकदा आयुष्या विषयी बोलते , शाप कुठला असू शकतो … जमिनीवर घट्ट पाय रोवण्याचा कि आकाशात भरार्या न घेण्याचा ? कि वर्तमानात जगण्याचा !

'जग हे संधीसाधूंचे' या कवितेतून एक धाडसी विधान कवियत्रीने केले आहे, आजची परिस्थिती पाहता याचा प्रतेय हि पावलो पावली येतो. प्रत्येकजन मुळात संत असतो पण त्याच्या मनात एक रावणही निद्रिस्त अवस्थेत असतोच असतो …. आणि त्याला संधी मिळायलाच अवकाश तो जागृत होतो … आता काही लोक अश्या कितीतरी संधी सोडतात हि …. म्हणूनच कवियत्री पुढे म्हणते कि, 
" संधी मिळायलाच अवकाश कि,
गरीब वाटणारा माणूसहि 
बनतो हुकुमशहा !"

पुढील एक रचनेत दु:ख आणि पावूस यांची साथ कशी असते हे रेखाटले आहे, 

"ज्याची तिची राधा अन 
जिचा तिचा कृष्ण" 

"नाती तुटताना आवाज होत नाही"

"कुठल्या हि गोष्टीचा प्रवास सुंदरच असतो… 
पण हे आपल्याला प्रवास संपल्यावरच उमगतं …"

अश्या किती तरी सुंदर ओळी पुढील कवितांमधून वाचनात येतात आणि … 
मनाच्या काठावरून फेरफटका मारताना आपण … "मन गाभार्यात प्रवेश करतो …." आणि कविता संग्रह संपतो… !

एक विलक्षण उत्सुकता बाकी राहते… मन गाभार्यातल्या काळोखातील मनाचे पदर आणखी उलगडले जायला हवे होते असते वाटते … पण कदाचित वाचकाची हि उत्सुकता …. कवियत्रीने जाणूनच वाढवली आहे, त्यामुळे 'मनीषा सिलम' यांच्या पुढील लेखनात आपल्याला मनाचे आणखी काही पदर उलगडताना दिसतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही 

कविता संग्रह वाचून संपवला आणि 
पुन्हा एकदा 
कधी "मन वढाय वढाय" 

तर कधी 
"मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल" 

या प्रसिद्ध गीतांच्या ओळी मनात फेर धरत गेल्या 

हा छोटेखानी कवितासंग्रह अतिशय सुंदर झाला आहे … मात्र आणखी काही कविता यात हव्या होत्या असे वाटते, मुखपृष्ठ चांगले आहे. 
पुढील संग्रहासाठी काढताना या कवितांसाठी वापरलेला टाईप (फोन्ट) टाळून … साधा फोन्ट घ्यावा जो (संपूर्ण प्रस्तावनेसाठी वापरला आहे) आणि पुस्तकाचा कागद न्याचरल शेड चा असल्यास कवितासंग्रह आणखी देखणा होईल. 

कविता संग्रह : मनाच्या काठावरून 
कवियत्री : मनीषा सिलम 
प्रकाशक : उद्वेली बुक्स, ठाणे 
मुल्य : ८० रु. 

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment