Dec 12, 2018

पत्रोत्तर


मित्रा,
तुझे पत्र मिळाले
तू मजेत आहेस हे समजले.
आम्ही ही इकडे मजेत आहोत ....
फरक फक्त हाच की मागच्यापेक्षा ....
यावेळीचा उन्हाळा जरा जास्तच कोरडा आहे.
तु म्हणतोस, ‘गावाकडं यायचंय ...’
‘‘कशाला येतोस ?
फार उशीर झाला आहे रे आता ..
आपण दिवसभर डुंबायचो ती विहीर
कधीच आटली आहे.
पुर्वी नवविवाहीता मोठ्या विश्वासाने
पाणी भरायच्या त्या विहीरीवर...
दरम्यानच्या काळात त्यातील कित्येकजणींनी
आत्महत्या केलीय .. त्याच विहीरीत उडी घेऊन.
तू म्हणतोस ...
ती विहिरीवरची ‘मोट’ही कधीच लुप्त झालीय,
अन् त्यासोबत पाटाच्या पाण्याचा झुळझुळ आवाजही.
झाडाखालची आपली शाळा, आता पार बदलून गेलीय.
आख्खं आयुष्य शाळेसाठी देणारे देशपांडे मास्तर गेले,
तेव्हा आठवणं आली होती तुझी ...
कारण तू म्हणायचासं ‘मास्तर, मी पण मास्तर होणार,
आपल्या शाळेत शिकवणार’
आता शाळेत कित्येक सर आहेत...
पण एक मास्तर भेटत नाहीत !
आपण दिवसभर ज्याच्याभोवती हुंदडायचो
तो पिंपळपाराचा कट्टा नावापुरताच उरलाय
अन् कट्टयावचा पिंपळही कधीच इतिहासजमा ठरलाय.
म्हातारी खोडं आता कट्ट्यावती बसत नाहीत...,
खोडं एकटीं कारण नातवंही सोबत दिसत नाहीत.
कधीकाळी भल्या पहाटं खांद्यावर फावडं टावूâन
निघणाऱ्या शेतकऱ्याची तरुण पोरं ...
आता दिवसभर गावातच फिरत असतात ...
कधी या झेंड्याखाली तर कधी त्या झेंड्याखाली.
भविष्य हरवलेल्या खेड्यागत.
मित्रा,
तू मागे सोडून गेलास ते तुझं गाव...
आज तुला सापडेलच असं नाही.
अन् माझं म्हणशील तर...
मीही आज कुणाला माझ्या गावाची ओळख देत नाही.
तू गाव सोडलंस तेव्हा अडवलं होतं मी तुला...
मोठ-मोठ्या आदर्शाच्या गोष्टी सांगून.
तू ऐकल नाहीस ... निघून गेलास ...
गावं मागं सोडून ... तुझ्यासोबत कित्येकजणांना घेऊन ...
मी राहिलो इथेच ... प्रत्येकाला विरोध करतं,
आदर्शाच्या गोष्टी पेरत.
मित्रा,
तू जिंकलास
मी हरलोय !
वाईट फक्त एकच वाटतय की,
तू सोडून गेलास ते तुझं गाव...
मी तुला परत देऊ शकत नाही.’’
- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment