Aug 18, 2013

१) बुडीत बेणं ! (अनाकलनीय गोष्टी)

अनाकलनीय गोष्टी

जगात अशा बर्याच गोष्टी घडत असतात ज्या सामन्यांसाठी नेहमीच अनाकलनीय असतात आणि कुठेतरी कुतूहलाचा विषय असतात. काही गोष्टींची उत्तरं मिळतात काही गोष्टींची उत्तरं मिळत नाहीत तर काही गोष्टींची उत्तरं कालांतराने मिळतात. अश्याच काही गोष्टी माझ्याही मनात घर करून असतात कारण मीही सामान्य आहे  …. अश्या काही गोष्टी असह्य होतील तश्या आणि वेळ मिळेल तश्या प्राधन्यक्रमाने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. काही गोष्टींच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहे तर काही गोष्टी तुमच्या डोक्यात सोडणार आहे, कारण मला माहित आहे एकदा किडा वळवळला कि तुम्ही हि स्वस्थ बसणार नाहीच आणि त्यातूनच कदाचित मला न सापडलेल्या गोष्टींची उत्तरे मिळू शकतील !  
 ……………….………………. ………………. ………………. ………………. ………………. ……………….    

१) बुडीत बेणं !

मला माहित आहे, आता 'बेणं' म्हणजे काय हे सुद्धा कदाचित सांगावं लागलं पण हरकत नाही, तो हि सामान्य डोक्यातून आलेलाच प्रश्न असेल त्यामुळे त्याचं उत्तर देणं हि आलच. बेणं म्हणजे काय हे सगळ्या शेतकऱ्यांच्या लेकरांना माहित आहेच जरी ते नामशेष होत आलं असलं तरी. निदान 'काय अवकाळी बेणं आहे हे ?' या अर्थानं तरी नक्किच माहित असणार.

आपणा सगळ्यांना माहित असेल … पूर्वी पेरणी अगोदर मागल्या वर्षीचं चांगल्या प्रतीचं धान्य निवडून ते बाजूला ठेवल्या जायचं  … पुढच्या वर्षी शेतात पेरण्यासाठी, आज हे प्रयोग बहुतेक करून फक्त 'उस', 'अद्रक' अश्या काही पिकांसाठीच केले जातात, पण काही शतकांपूर्वी जे शेतात पेरायच आहे ते घरीच मिळायचं हे बीज म्हणजे 'बेणं' (इथे 'बेणं' असं प्रत्येक पिकासाठीच्या प्रजननक्षम बियाण्याला म्हटलं जातं का कि फक्त बेणं म्हणजे उसाचं ! हा हि प्रश्न आहे !). बेणं हे चांगल्या प्रतीच असाव म्हणून ते निवडून घेतलं जायच, चांगल्या प्रतीच म्हणजे जे प्रजननक्षम असेल असं ! पण आजकाल शेतात काही पेरायचं असलं तर शेतकऱ्याला तालुक्याच्या दुकानात धाव घ्यावी लागते सोन्यासारखा भाव देवून प्रक्रिया केलेलं बियाणं विकत घ्यावं लागतं, आणि 'ते पेरलं तरच उगवतं आणि जे पेरलं ते परत 'बेणं' म्हणून वापरता येत नाही !' ते उगवत नाही किंवा त्याची उगवण्याची क्षमता कमी असते म्हणजे ते नपुंसक असतं असंच म्हणावं लागतं ! कमी जमिनीत, कमी मेहनतीत जास्तीत जास्त पिक घेण्याच्या हव्यासापोटी सामान्य शेतकरी (शेतकरी सामान्याच असतो तरी) या दुष्ट चक्रात अडकला आहे आता त्यातून सुटका होईल असं वाटत नाही !

आज बाजारात मिळणारे फळे / भाजीपाला पहा, त्यांचा पूर्वीचा नैसर्गिक रंग केंव्हाच नाहीसा झाला आहे, मिरचीचा रंग हिरवा असतो, लाल असतो, पिवळा असतो कि केशरी ? गावरान काकडी हिरवी असते कि पिवळी ? वांग्याचा रंग हिरवा पंधरा कि जांभळा ? एवढेच काय आकार पण बदलले आहेत, चव तर विचारूच नका, कारण खरी चव आपल्याला माहितच नाही, सांगा किती जणांना छोट्या काकडीची चव माहित आहे ? माहित असणारांना आठवते आहे ?

तर हे सगळ अश्या पद्धतीने चाललं आहे, आता तर इकडे हि चायना मार्केट आलं आहे. पण चिंता करण्याची खरी गोम वेगळीच आहे. मला सांगा जे आज शेतात पिकतं ते बियाणं नंतर 'बेणं' म्हणून कामाचं नाही (प्रक्रिया केल्याशिवाय), उगवत नाही ! ने नपुंसक नाही ?…. आणि ते खाल्ले तर तुमच्या क्षमतेचं काय ? जरा विचार करा सध्या माणसातील नपुंसकतेच प्रमाण किती वाढले आहे …. ? भयंकर आहे ! ढोबळमानानं  पहिलं तर २५% जोडप्यांना प्रजनन प्रक्रियेत काही न काही अडचणी येत आहेत, प्रक्रिया केल्या शिवाय ते या गोष्टींसाठी सक्षम होत नाहीत !

लोकसंख्या वाढीच्या उद्रेकापोटी आपली भूक वाढत आहे आणि आपण खूप काही चांगल्या गोष्टी विसरत चाललो आहोत, गमावत चाललो आहोत, नव्हे त्या आपणच बुडीत काढत आहोत. हे सगळ पाहिलं कि वाटतं लोकसंख्या वाढीवर उपाय या दुष्ट चक्रातून सुटका  म्हणून 'मनुष्य जसा अनिर्बंध कुत्र्यांची पैदास रोकण्यासाठी त्यांची नसबंदी करत असतो' तोच प्रयोग तर निसर्ग मनुष्य जातीवर करत नसेल ?  एक दिवस 'मनुष्य जातीवरच' 'बुडीत बेणं' असा शिक्का लागू नये म्हणजे मिळवली …. नाहीतर आहेतच पुन्हा तालुक्याची दुकानं !

- रमेश ठोंबरे    

Aug 13, 2013

गझल


कोणता आजार आहे ?
चेहरा लाचार आहे 

कर्म आता 'म्यान' केले
बोलणे तलवार आहे

फाटले आभाळ तेंव्हा
घेतला कैवार आहे

दु:ख झाले फार आता
मांडला बाजार आहे !

देश 'गांधी' लाच घेतो
तूच साक्षीदार आहे !

सत्यता सांगू कशाची ?
'सत्य' ही बेजार आहे !

लोकशाही 'हास्य' झाली
हासतो 'सरदार' आहे !

- रमेश ठोंबरे 

Aug 7, 2013

एक वळवळणारा किडा



आज एकदाचा सोक्ष-मोक्षच लावायचाच 
असा पक्का इरादा करून …. 
सात माजली इमारतीच्या पायर्या चढून… 
गच्चीवर आलो … 
बापू आधीच पोचले होते,
माझीच वाट पाहत होते …!

माझ्या छातीचा भाता झालेला पाहून
माझ्याकडे एक कुत्सित नजर टाकून
बापूनी विचारले !
'बोल काय म्हणतोस ?'

मी धापा टाकत म्हणालो ….
"तुम्हाला काही बोलायच तर
हे अस … सातव्या मजल्यावर याव लागत…
नाहीतर त्या तिथे खाली बोलत बसलो तर …
लोक वेड्यात काढतात मला"

"कालच तो श्याम म्हणत होतो,
माझ्या बोलण्यात राम नाही म्हणे
माझं एकतर्फी बोलणं असत्य वाटतं त्याला !
तुमच्याशी माझं बोलणं असत्य ठरवतात हे लोक…

आणि तो पहा तिकडे तो नईम …
रस्त्यावरच हिंसेचा ठेला मांडून बसलाय.

द्वेष आणि इर्षा तर यांच्या जगण्याची
तत्वच बनलीत !

आणि अशांती तर प्रत्येकाच्या
डोक्यात थयथयाट करत असते.

मग मला सांगा बापू कुठे दिसतेय तुम्हाला …
सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांती ?

बापू खाली बोट दाखवत म्हणाले …
"एवढ्या दूरवरून नाही दिसणार ती.
ती तर तिथेच आहे, जिथून तू पळ काढलास ….
जिथे तू 'असत्य, हिंसा, द्वेष आणि अशांती'
पाहिलीस तिथेच तुला
'सत्य, अहिंसा, प्रेम आणि शांती !' हि शोधावी लागेल !

मी खाली वाकून पाहू लागलो ….
शामची टपरी, नईमचा ठेला आणि विस्तीर्ण वस्ती !
थोड्या वेळाने मागे वळून पाहतो तर बापू निघून गेले होते
माझ्याच डोक्यात पुन्हा एक नवीन किडा सोडून….
आणि तो अजून हि वळवळतो आहे !

- रमेश ठोंबरे