Oct 3, 2012

अभिप्राय

तिने लेखन क्रिया केली
आणि त्याने,
लगेच प्रतिक्रिया दिली.

म्हणाला,
"वरून दुसरी ओळ ...
जराशी विसंगत झाली आहे.
आणि याच कारणाने हि द्विपदी
पार रसातळाला गेली आहे.

दुसऱ्या कडव्यातल्या तिसर्या ओळीत
एक शब्द जास्त आहे.
तू हवं तर मोजून पहा ..
माझं(च) म्हणन रास्त आहे.

तिसऱ्या चरणाच्या 'लगावली'त
थोडीशी गडबड आहे.
भाव-भावना ठीक ठाक
पण मात्रांची पडझड आहे.

चौथ्या कडव्यातील दुसरी ओळ
'अशी' लिहिलीस तर बरं वाटेल.
अर्थ थोडा बदलतोय
पण गाताना खरं वाटेल !

पाचव्या कडव्यामध्ये
काव्य कुठं दिसलं नाही,
आणि त्याच तिथे नेमकं
यमक सुद्धा बसलं नाही.

बाकी कविता चांगली आहे,
पण अजून छान होवू शकते.
थोडी उडी घेतलीस तर
आणखी उंच जावू शकते.  

आणि हो, एक राहिलं
सुरवातीला 'प्रिय' आणि शेवटी 'तुझीच'
असे शब्द कवितेत नसतात.
मी खात्रीनं सांगतो ...
हे फक्त प्रेमपत्रात लिहित असतात.


ता.क. : भावना ओतण्याच्या नादात लय सोडू नकोस !

- रमेश ठोंबरे
  http://rameshthombre.blogspot.com/

No comments:

Post a Comment