Jul 30, 2011

कल्लोळ ते कविता


त्याच्या मनात कल्लोळ ..
कधी शब्दांचा, कधी भावनांचा, कधी यमकांचा
कधी रुपकं आणि अलंकार हि घालत असतात गोंधळ .
हो.....,
कागदावर उतरेपर्यंत ...
कल्लोळच असतो नुसता.

कधी शब्द अधीर होऊन कागदावर अलगद उतरतात.
कधी फरफटत... ओढत नाविलाजास्तव पसरतात.
कधी शब्द उठाव करतात ...
कधी आंदोलन आणि कधी सत्याग्रह हि !
सगळं हवं असतं त्यांना जश्याच्या तसं ...
व्यक्त होताना कुठलीच आडकाठी नको असते,
ते हट्ट धरतात आणि
पुरा हि करून घेतात त्याच्याकडून.
तेंव्हा त्यांना अर्वाच्य आणि
'असाहित्यीक' म्हणून हिणवले जातं
तिथे शब्द कमी पडतात ...
पण भावनांचा विजय होतो !

कधी शब्द तट्टू होतात.
भावना खट्टू होतात ....
शब्द भाव खातात....
आणि
भावना उचंबळून येतात,
कधी लय बिघडते ...
कधी मात्रा कमी पडते.
तेंव्हा शब्द मोजून, ठोकून ओळीत बसवले जातात ....
तेंव्हा ... भावना कमी पडतात...
अन शब्दांचा विजय होतो !

कधी इतकं सहज होत सगळं कि,
आभाळ भरून यावं
अलगद थंड हवा सुटावी ....
आणि धरतीच्या कोर्या कागदावर
पावसाच्या रूपाने एक हिरवं चित्र साकार व्हावं,
अगदी तसं होतं.

अगदी तसे उतरतात ...
...... शब्द आणि भावना
हातात हात धरून...
...
....
.......
तेंव्हा संपतो कल्लोळ
आणि त्याची होते कविता ....!



- रमेश ठोंबरे
दि. ८ फेब्रु. २०११

1 comment: